Sunday, December 20, 2009

लेखनकलेची आराधना

ईश्वराच्या आराधनेसाठी तंत्रांची निर्मिती ही भारताची सिद्ध परंपराच आहे. लेखनासारख्या एखाद्या कलेसाठीही तंत्रज्ञानाची कास उपयुक्त ठरत आहे. लेखकांना उपयुक्त अशी वायरायटर सारखी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत परंतु बहुतांशी ती लिहिलेल्या मजकुराचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्यासाठी आहेत.

विद्यार्थ्यांना आणि नवोदित लेखकांना ब्लॉग्ज लिहिण्यामुळे आणि सोशल नेटवर्क साईट्‌सवर लेखन केल्यामुळे लेखनाचा चांगला सराव होतो आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढीस लागतो असे निदर्शनास आले आहे. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील तीन हजार विद्यार्थ्यांची पाहणी केली असता जी मुले ब्लॉग्ज लिहितात त्यांच्यापैकी एकसष्ट टक्के आणि जी मुले सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर लिहितात त्यांच्यापैकी छप्पन्न टक्के मुलांमध्ये असा आत्मविश्वास विकसित झाल्याचे आढळले. ऑनलाइन लेखन करणारी ही मुले कथा, पत्रे, दैनंदिनी आणि गीते लिहिण्यातही तरबेज झाल्याचे आढळले.

संशोधनाचा हा दावा अर्थातच सर्वांना मान्य होण्यासारखा नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि संगणक अशा यंत्रांमुळे सर्जनशीलतेची हानि होते असे बऱ्याच जणांचे मत आहे. असे असले तरी आता "लेखन' ही क्रियाच संगणकाशी निगडित झाल्याने ह्या तंत्रज्ञानाच्या आधारे लेखनाचा सराव विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

Wednesday, December 16, 2009

शिस्त लावण्याचे उपाय - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 12

विद्यार्थ्यांना "शिस्त लावता येण्याचे' काही तंत्र आहे का?

विद्यार्थ्यांच्या "बेशिस्तीची' विविध कारणे आपण ह्या आधीच्या नोंदीमध्ये थोडक्यात पाहिलेली आहेत. 'Discipline' ह्या इंग्लिश शब्दाचा अर्थ शिकणे असा होतो. (Disciple = शिष्य). त्यामुळे शिस्त ही ‘लावण्याची' गोष्ट आहे हे अर्वाचीन आणि प्राचीन विद्वानांना पटते आहे असे दिसत नाही. शिक्षकाची भूमिका 'अधीक्षका'ची झाली त्यामुळे लष्करी शिस्तीची संकल्पना शिक्षणक्षेत्रात आली. "अथ आत्मानुशासनम्‌' अशा आदर्शवादापासून समाज दूर झाला की शिक्षकाचा नैतिक अधिकार स्वयंसिद्ध रहात नाही त्याला उसन्या पेडस्टलची किंवा दंडाधिकाराची गरज भासते.

मानसशास्त्रातील विविध मतप्रवाहांचे विविध काळी प्राबल्य होते असे आढळते. मानवी वर्तणुकीवर ताबा मिळवण्याच्या तंत्रांचे त्या मतांनुसार प्रतिपादन होत राहिले. सध्या अशा तंत्रांमध्ये न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग किंवा "एनएलपी' चा बराच बोलबाला आहे.

रिचर्ड बॅंडलर आणि जॉन ग्राइंडर हे ह्या संकल्पनेचे जनक होत. Frogs into Princes ह्या त्यांच्या लोकप्रिय पुस्तकातून ह्या संकल्पनेचा प्रसार झाला. मज्जासंस्था आणि भाषा ह्यांच्यातील सहयोगातून वागणुकीवर प्रभाव पडतो किंवा पाडता येतो अशा स्वरूपाचे हे गृहीतक आहे आणि त्याच्या आधारे तयार केलेली उपचारपद्धती अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांवर उपाय असल्याचा दावा करण्यात येतो. image

हे तंत्र अपेक्षेनुसार वादविवादांच्या भोवऱ्यात आहेच. आदर्शवादी विद्वान आणि परंपरावादी विचारांचे समर्थन करणारे असे दोन टोकांचे लोक आपल्या अनुशासनपद्धतीसाठी ह्या तंत्राची कास धरावी असे म्हणतात हे विशेष. एनएलपी विषयी सोप्या शब्दात माहिती देणारे हे संकेतस्थळ अवश्य पहावे.

साचेबंद वागणूक नाकारणारे (= बेशिस्त) विद्यार्थी तसे का वागतात ह्याची अनेक प्रकारची कारणे असल्याने सर्वांना "रुळावर आणण्यासाठी' एकाच प्रकारचे (उदाहरणार्थ भाषिक क्लृप्तीचे) तंत्र वापरता येईल हे शक्य वाटत नाही. अनेक अनाक्रमक तंत्रांपैकी ते एक असू शकते. विद्यार्थ्यांने झापडबंद विचाराचे न होता त्याची विवेकबुद्धि शाबूत रहावी आणि त्याच्या आधारे त्याला स्वैराचारावर मात करता यावी असा आदर्शवादी विचार आहे.

विद्यार्थ्याला, मग तो बेशिस्त असो वा नसो, विचार करायची सवय लागायची असेल तर मुळात शिक्षकाला विचार करण्याचे वावडे असता कामा नये. झापडबंद किंवा टोपल्या टाकणाऱ्या शिक्षकांना विचार करण्याचा आळस असतो किंवा सवय नसते. ती सवय जर त्याने अंगी बाणवली तर त्याच्या विद्यार्थ्यांपुढे त्याचे एक उदाहरण राहील आणि त्यातून विचारांची सवय त्यांना लागू शकेल व यथावकाश त्यांचा प्रवास आत्मानुशासनाकडे होऊ शकेल.

अशी ही चिकाटीने साध्य करायची दीर्घ प्रक्रिया आहे. एका वर्षापेक्षा अधिक काळ एकाच वर्गाला शिकवणारे शिक्षक त्या वर्गाचे चांगले नियंत्रण का करू शकतात ह्यामागच्या कारणांपैकी हे महत्त्वाचे कारण आहे. कारण विद्यार्थ्यांना शिक्षकाची पुरेशी ओळख पटण्यास आणि चांगुलपणाची प्रेरणा घेण्यास आवश्यक वेळ मिळतो. बडगा उगारून किंवा एखाद्या उसन्या "तंत्राने' अल्पकालीन यश मिळेलही व त्या दृष्टीने तंत्रांचा डोळस वापर अवश्य करावा पण शाश्वत परिणामासाठी "उप-देशा'ला (शब्दशः, गुरुच्या सान्निध्यात अधिकाधिक काळ राहण्याला) पर्याय नाही.

Saturday, November 14, 2009

बेशिस्तीची कारणे - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 11

विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणे कोणती ?

ह्या प्रश्नाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे लहान लहान भाग करून त्याचा विचार करू. बेशिस्त नेमके कशाला म्हणावे यापासून सुरुवात आहे. सध्या त्या विषयात न शिरता त्यावर सर्वसाधारण एकमत आहे असे समजूया. कारणे अनेक प्रकारची आहेत. बेशिस्तीला कारण कोण आहे यावर कारणे कोणत्या प्रकारची आहेत हे ठरते.

विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीला स्वतः विद्यार्थी, त्यांचे पालक/सामाजिक परिस्थिती, शिक्षक आणि शाळा हे चार प्रमुख घटक कारणीभूत असतात. ह्या प्रत्येक घटकातील दोष किंवा उणीवा अंतिमतः विद्यार्थ्यांमधील "बेशिस्ती'च्या स्वरूपात व्यक्त होतात. विद्यार्थ्याची एखादी वागणूक आपल्याला आवडत नसेल तर त्यामागे वरील चारांपैकी नेमक्या कोणत्या घटकाचा दोष जास्त आहे ह्याचा वस्तुनिष्ठपणे शोध घेण्याची सवय शिक्षकाने लावून घ्यायला हवी.

विद्यार्थ्यांशी संबंधित कोणते घटक शिक्षकाने त्यांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करताना विचारात घ्यावे?
सरसकट सर्व विद्यार्थ्यांसाठी अमूकच घटक अमूक कार्य करतात असे मानणे योग्य नसते. तरीही काही ठोकताळे आणि निरीक्षणे खाली दिलेली आहेत :

विद्यार्थ्याच्या वयाशी निगडित घटक
वाढत्या वयासोबत -

  • विद्यार्थ्याच्या शिक्षकाकडे असलेल्या मागण्या आणि शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षा बदलतात.
  • विद्यार्थ्यांचे एकमेकांशी जे नाते असते त्यात बदल होतो.
  • वर्गाच्या दृष्टीने आपली प्रतिष्ठा काय असावी याबाबत विद्यार्थ्याच्या अपेक्षा उंचावतात.
  • विद्यार्थी अधिक सशक्त आणि थोराड होतात.
  • प्रौढांच्या वागणुकीबाबत ते अधिक टीका करू लागतात.
  • स्वतःच्या अपयशाबद्दल प्रौढांना जबाबदार धरण्याची त्यांची प्रवृत्ती वाढते.
  • विद्यार्थ्यांची संवेदनक्षमता वाढते.
  • सामाजिक अस्थैर्याने ते जास्त अस्वस्थ होतात.
  • विद्यार्थ्याच्या क्षमतेशी निगडित घटक

    • अधिक क्षमतेच्या विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करावा असे वाटत असते.
    • भिन्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून भिन्न वागणूक अपेक्षित असते. (जसे; काहींना संयम आणि सहानुभूती हवी असते)
    • आपल्या क्षमतेच्या पातळीनुसार विद्यार्थ्याचे स्वतःच्या यशाचे आणि अपयशाचे निकष बदलतात.
    • विद्यार्थ्यांना आपल्या विभिन्न क्षमतांशी सुसंगत अशा विभिन्न सुविधांची आणि उपकरणांची गरज असते.

    विद्यार्थ्याच्या लिंगाशी निगडित घटक
    विद्यार्थी मुलगा आहे की मुलगी आणि समाजात स्त्री-पुरुषांच्या आदर्श भूमिका कोणत्या मानल्या जातात याच्याशी निगडित घटक.
    उदाहरणार्थ;

    • प्राथमिक शाळेत मुली शिक्षकांशी जास्त सहकार्य करतात.
    • मुली लवकर वयात येतात.
    • शिक्षकांच्या मुलांकडून आणि मुलींकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात (परंतु चांगले अनुभवी शिक्षक तसे जाणवून देत नाहीत.)
    • वाढत्या वयानुसार मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या विषयात रस वाटू लागतो.
    • मुली भावनांच्या प्रकटनावर भर देतात तर मुले भावना शारीरिक हालचालींमधून (मस्ती करणे) व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात.

    विद्यार्थ्याच्या सामाजिक - आर्थिक परिस्थितीशी निगडित घटक
    (विश्लेषण करताना सामाजिक-आर्थिक घटकांना जरुरीपेक्षा जास्त महत्त्व दिले जाण्याची शक्यता असते ह्याचे भान नेहमी असायला हवे.)

    • साधारणतः गरीबांची मुलांना दबून वागण्याची तर श्रीमंतांच्या मुलांना उन्मत्तपणे वागण्याची सवय लागते. (जितक्या लहान वयापासून मुले एकत्र असतात, उदाहरणार्थ शिशुवर्गापासून,  तितका हा दोष कमी होतो)
    • शाळेमध्ये शिकवण्यात येणारी मूल्ये सधन वर्गाच्या चालीरीतींशी सुसंगत असण्याची शक्यता जास्त असते.
    • सधन मुले जास्त क्षमतेच्या गटात तर निर्धन मुले कमी क्षमतेच्या गटात आहेत असे मानण्याकडे शिक्षकांचा कल असतो.
    • चांगल्या वागणुकीचे चांगले फळ मिळण्यासाठी वाट पाहण्यास सधन मुले तयार असतात. निर्धन मुलांना हा विश्वास वाटणे अवघड असते.

    समाजगटविशिष्ट सांस्कृतिक घटक
    (विश्लेषण करताना काही घटकांना, उदाहरणार्थ, सामाजिक-आर्थिक घटकांना जरुरीपेक्षा जास्त महत्त्व दिले जाण्याची शक्यता असते. सांस्कृतिक घटकांबाबत तर ह्याचे भान नेहमी असायला हवे.)

    • काही समाजगटांमध्ये धार्मिक आणि नैतिक संकेत जास्त काटेकोरपणे पाळले जातात. (उदाहरणार्थ, शाकाहार-मांसाहार/एकत्र खाण्यापिण्यास मज्जाव)
    • धार्मिक कृत्ये आणि कर्मकांडे ह्यांचा काही विद्यार्थ्यांच्या शाळेतील वागणुकीवर परिणाम होऊ शकतो. (उदाहरणार्थ उपवास करणे)
    • दोन समाजगटांमध्ये पारंपारिक वैर असणे
    • एका गटाच्या भाषेची/बोली भाषेची दुसऱ्या गटाकडून टिंगल होणे
    • सामाजिक आणि भावनिक संयम किती प्रमाणात असावा ह्याबाबत भिन्न संस्कृतींचे भिन्न निकष असणे.

  • Thursday, October 8, 2009

    प्रश्नपेढी

    प्रश्नपेढी तयार करणे हा धडपड्या शिक्षकांचा एक लाडका उपक्रम आहे. मीही माझ्या दुसऱ्या अनुदिनीवर प्रश्नांच्या विविध प्रकारांची थोडक्यात ओळख करून देण्याचा केलेला प्रयत्न येथे आणि येथे पाहता येईल. बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय हे आजच्या तरुण शिक्षकांना कदाचित सांगता येणार नाही. पण केबीसी टाईप प्रश्न (= कौन बनेगा करोडपती) (क्षमस्व; पण अडाणी लोकांसाठी कंसात असे समजावून द्यावे लागते) असे म्हटले की लगेच समजते. एक अध्यापन साधन म्हणून प्रश्नांचा कसा वापर करता येतो यावर अजय भागवत यांनी लिहिलेला एक सुंदर लेख येथे पाहता येईल.

    योग्य प्रश्न विचारणे हे खरोखरच अतिशय महत्त्वाचे आहे. विचारवंतांना पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातूनच मानवाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. ह्या तत्त्वज्ञांना आणि शास्त्रज्ञांना पडणारे प्रश्न त्यांनी स्वतःपाशी न ठेवता एकमेकांना विचारावेत आणि त्यासाठी किमान शंभरेक विद्वानांना एका खोलीत कोंडून ठेवावे असे जेम्स ली बायर्स ह्या विख्यात चित्रकाराच्या मनात आले आणि लगेच तो त्या कामाला लागला. त्यातूनच एज फाऊंडेशनच्या जागतिक प्रश्न केंद्राची निर्मिती झाली. 1998 पासून ह्या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे. दरवर्षी एक प्रश्न विचारण्यात येतो. त्याची उत्तरे देणारे तज्ञांचे आणि शास्त्रज्ञांचे लेख आपल्याला ह्या संकेतस्थळावर वाचावयास मिळतात. संपादनाची आणि प्रकाशनाची जबाबदारी एज फाऊंडेशनचे संस्थापक जॉन ब्रॉकमन सांभाळतात.

    यावर्षीचा प्रश्न आहे, WHAT WILL CHANGE EVERYTHING?  त्याला केविन केली यांनी "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' हे उत्तर दिले आहे तर हॉवर्ड गार्डनर यांनी "जनुकशास्त्र आणि मानसशास्त्र ह्यांच्या सहयोगातून हुशारीचा शोध' असे उत्तर दिले आहे. स्टीव्हन पिंकर ह्यांनी "पर्सनल जेनॉमिक्स' असे उत्तर दिले आहे. तुमच्या जीनोमचे स्विक्वेन्सिंग तुम्हाला आता  (3.5 लाख डॉलर्सना) मिळू शकते. स्टीव्हन श्नायडर ह्यांनी ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळण्याचा धोका जवळ येऊन ठेपल्याचे सांगितले आहे. या वर्षीचे असे 151 लेख आहेत. 1998 सालापासूनचे असे अनेक लेख तुम्ही ह्या संकेतस्थळावर वाचू शकता. हा खजिना म्हणजे खरी प्रश्नपेढी (आणि उत्तरपेढीसुद्धा) आहे.

    Thursday, October 1, 2009

    पृथ्वीचे आक्रंदन आणि बॅरी कॉमनर

    बॅरी कॉमनर हे अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी असून Centre for the Bilogy of Natural Systems ही संस्था त्यांनी स्थापन केली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढविलेली होती. अणुचाचण्यांना त्यांचा प्रखर विरोध आहे. रीगन आणि बुश यांनी प्रदूषण टाळण्यात कुचराई केल्याबद्दल त्यांच्यावर कॉमनर यांनी टीका केलेली आहे.
    पर्यावरणाच्या ऱ्हासाचा अभ्यास करणे फॅशनेबल नव्हते तेव्हापासून बॅरी कॉमनर ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही प्रकारच्या देशांमधील पुरोगामी विचाराच्या लोकांना भावलेले असे त्यांचे हे पुस्तक आहे. Making Peace With The planet हे बॅरी कॉमनर ह्यांचे पुस्तक गेल्या दशकात बरेच गाजले. पुस्तकाची अनेक परीक्षणे झाली.

    Sunday, September 13, 2009

    वर्गातील शिस्त : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 10

    शैक्षणिक गुणवत्तेसाठी वर्गात शिस्त राखणे अनिवार्य नाही का? बदलत्या सामाजिक परिस्थितीत अशी शिस्त राखणे शिक्षकांना किती शक्य होते?

    हा प्रश्न सध्याच्या काळात जास्त तीव्र झालेला आहे असे वाटत असले तरी तो सार्वकालिक आहे. काळानुरूप प्रश्नवेगवेगळ्या भाषेत व्यक्त होत आलेला आहे. शिक्षकाने समंजस असण्यावर भर वाढत गेला तसतशी ही भाषा बदलतगेली आहे.

    Friday, September 11, 2009

    चांदोबा

    माझ्या पिढीचं (माझ्या आधीच्या आणि नंतरच्या पिढ्यांचंही) बालपण समृद्ध करण्यात फार मोठा वाटा "चांदोबा' चा आहे. दक्षिणेकडील आणि बहुभाषिक प्रकाशन असूनही "चांदोबा'चा तोंडवळा अस्सल मराठमोळा आहे. वेताळाच्या गोष्टी असोत, परोपकारी गोपाळाच्या असोत की "भयानक दरी'सारख्या चांदोबा-स्पेशल गोष्टी असोत चित्रा आणि शंकर ह्यांच्या चित्रांनी नटलेल्या ह्या सर्व साहित्याने माझ्या भावविश्वात घर केलेलं आहे. व्हिडिओimage गेम्सच्या आणि मल्टिचॅनेल करमणुकीच्या आजच्या जगातही चांदोबा मुलांना श्रेष्ठ बालसाहित्य देऊ शकेल यात मला यत्किंचितही शंका नाही. मात्र आपण पालकच त्याला विसरतो आहोत का याची शंका येते.

    माझ्या अनेक मित्रांकडे चांदोबाचे जुने अंक बाईंड केलेले आहेत. इतरांकडून हेळसांड होऊ नये म्हणून हा खजिना हे मित्र कंजूषपणे जपत असतात. सहज म्हणून चांदोबाचा नेटवर सर्च घेतला आणि मराठी चांदोबाच्या 14 वर्षांच्या अंकांचा खजिना येथे सापडला. हे अंक ऑनलाइन विनामूल्य वाचता येतात. तुम्हीही जर चांदोबाचे माझ्यासाखेच फॅन असाल तर चंदामामा प्रकाशनाला प्रतिसाद पाठवा आणि मराठीचे आणखी अंक उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करा.

    आणि हो. वर्षाला 240 रुपये ही चांदोबाची वर्गणीही फार वाटू नये.