Friday, July 22, 2011

अनंताची आरती Arati Anantachi

जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।
भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।।

भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।
दुकूलदोरक करुनि पूजिती अनंत नामानें ।।1।।

नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।
षोडशपूजा करूनि ब्राह्मण संतर्पण करिती ।।2।।

अपूप वायन दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।
अनंत संतुष्टोनि देती संतति संपत्ती ।।3।।

रामा धर्मा आचरिता व्रत क्लेशांतुनि सुटला ।
कौंडिण्याने पुजिता तुजला उद्धरिले त्याला ।।4।।

मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।
संकटकाळी रक्षी अनंता अपुल्या दासासी ।।5।।

Monday, May 30, 2011

शालेय नेतृत्व

"शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या ऊर्जेचा विनियोग समान शैक्षणिक उद्दिष्टांसाठी व्हावा ह्या दृष्टीने सुरू असलेली व्यवस्था म्हणजे शालेय नेतृत्व' अशी विकिपीडियाने शालेय नेतृत्वाची सुंदर व्याख्या केलेली आहे.

"योजकस्तत्र दुर्लभः' ह्या उक्तीप्रमाणे हे सारे घडवून आणणारा समर्थ मुख्याध्यापक लाभणे हे शाळेचे खरे भाग्य असते. हल्ली मुख्याध्यापकाचे पद शिक्षकांना बहुधा निवृत्तीच्या जवळ आल्यावर मिळते आणि काही करून दाखवावे अशी ऊर्मी तोपर्यंत विरून गेलेली असते. त्यातही मुख्याध्यापकाचे पद ग्रहण करणारी व्यक्ती उत्साह टिकवून धरणारी असली तरी शिक्षण खात्याचे निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकारी, शाळेचे सत्तालोलुप विश्वस्तमंडळ आणि चंगळवादाच्या अंमलाखाली असलेले शिक्षक - पालक आणि विद्यार्थी मुख्याध्यापकाची सत्त्वपरीक्षा पाहतात. परिणामी ह्या सर्वांना पुरून मुख्याध्यापकाची सर्जनशीलता शिल्लक उरलीच तर ती "मुख्य अध्यापक' म्हणून खर्च न होता "मुख्य प्रशासक' म्हणून तिचा वेच होण्याची शक्यता जास्त असते.

परंतु विक्रमादित्याच्या सिंहासनाचे जसे स्थानमाहात्म्य असावे तसे मुख्याध्यापकाच्या खुर्चीचे आहे आणि अनेक कर्तृत्ववान शिक्षक त्यांना मिळालेल्या नेतृत्वाच्या संधीचं सोनं करतात आणि आदर्श मुख्याध्यापकीचा वस्तुपाठ घालून देतात. त्यातही अनेक लोकप्रिय आणि ख्यातकीर्त मुख्याध्यापकांनी आपले विचार लिहून प्रसिद्धही केलेले असल्याने ते "पूढिलांना' स्फूर्तिप्रद ठरत आहेत. इंग़्रजी आणि मराठीतही अशी अनेक पुस्तके आहेत. विविध जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाणे मुख्याध्यापकाने कसे टाळावे आणि आपले काम नेटाने कसे पुधे न्यावे ह्याच्या विविध युक्त्या पॉल ब्लूम ह्यांच्या Surviving and succeeding in senior school management: getting in and getting on ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत.

श्री. ल. ग. घटे ह्यांचे "मुख्याध्यापकी : एक शास्त्र आणि कला' हे हर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तकही असेच स्फूर्तिप्रद आहे. घटेसरांच्या ह्या पुस्तकाला भारतीय शिक्षण मासिकाचे संपादक श्री. मधुकर पेठे सरांची सुंदर प्रस्तावना आहे. "मुख्याध्यापकांसमोरील जटिल प्रश्न', "शाळेला उठाव आहे हे कसे जाणावे?' "शाळेला उठाव कसा आणावा?' "शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी करावयाचे प्रयत्न' "भावनिक स्पर्श आणि ओलावा निर्मिती' "पैसा मिळवणे व वापरणे' ही ह्या पुस्तकातील काही प्रकरणांची शीर्षके पाहिली तरी पुस्तकाचा आवाका आणि उपयुक्तता ध्यानात येईल.
मुख्याध्यापकाने आपल्या शाळेसाठी नेमके काय करावे ह्याचा खात्रीचा फॉर्म्यूला देता येणे शक्य नाही. पण अशा तऱ्हेच्या पुस्तकांमुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळू शकेल.

Tuesday, May 17, 2011

वर्गपाठ किंवा गृहपाठ कसा द्यावा?

सर्वसामान्य शाळांमधून संमिश्र क्षमतेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग केलेले असतात. ह्या विभिन्न क्षमतेच्या मुलांना एकाच तासिकेत शिकवण्याची कसरत शिक्षकाला करावी लागते. विशेष वर्ग घेतल्याखेरीज विद्यार्थ्यांना क्षमतानिहाय गटांमध्ये शिकवणे शक्य नसते.

परंतु स्वाध्याय देताना शिक्षकांना असे स्वातंत्र्य घेता येणे शक्य आहे. Assignment Tiering च्या तंत्राचा विचार आणि उपयोग शिक्षकांनी अवश्य करावा.
विद्यार्थ्यांना शिक्षकाने जे शिकवले आहे त्याचे दृढीकरण व्हावे हा वर्गपाठ किंवा गृहपाठ देण्यामागील मुख्य उद्देश असतो. विद्यार्थ्याने हा अभ्यास स्वखुशीने आणि प्रामाणिकपणे केल्यास त्याला हा लाभ अधिक चांगल्या रीतीने मिळतो.

Assignment Tiering करणारे शिक्षक एकाच धड्यावर तीन ते चार प्रकारचे वर्गपाठ/गृहपाठ तयार करतात. प्रत्येक आवृत्तीची काठिण्यपातळी वेगवेगळी असते. विद्यार्थ्याला जी आवृत्ती आवडेल ती घेऊन त्यातील स्वाध्याय सोडविण्याची मुभा दिली जाते.

- स्वाध्याय स्वतः निवडल्याने तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याकडे विद्यार्थ्याचा कल असतो.
- विद्यार्थ्याने स्वतःला झेपेल अशी पातळी निवडल्याने जास्त यश त्याच्या पदरी पडते व अशा यशाची त्याला चटक लागते.
- हुशार विद्यार्थी जास्त कठीण पातळीचा स्वाध्याय निवडणे प्रतिष्ठेचे मानतात आणि त्यांच्या क्षमतांना आव्हान मिळाल्याने अभ्यासातील त्यांचे स्वारस्य वाढते.

अर्थातच ह्यासाठी शिक्षकाला थोडी जास्त तयारी करावी लागते.

- ह्या उपक्रमासाठी शालेय पातळीवर सर्वसंमत धोरण असणे फायदेशीर असते. शिक्षक प्रतिनिधींच्या मार्फत शाळा संचालन समितीची मान्यता घेता येते. विशेषतः मुद्रणासाठी जो थोडाफार जास्तीचा खर्च येतो त्यासाठी पूर्वसंमती घ्यावी.
- उपक्रमाच्या उद्दिष्टांबाबत पालकांना विश्वासात घेणे इष्ट असते.
- एकाच पाठावर विविध काठिण्यपातळी असलेले उपयुक्त स्वाध्याय कसे तयार करावेत ह्याचे तंत्र शिकून त्याचा सराव शिक्षकांना करावा लागतो. 
- कमीत कमी वेळात स्वाध्यायाच्या जास्तीत जास्त आवृत्त्या आणि प्रती तयार करण्याचे काम हातावेगळे कसे करावे हे सरावाने जमू लागते.
- विविध आवृत्त्यांच्या पुरेशा प्रती तयार ठेवाव्या लागतात आणि कोणता विद्यार्थी कशा प्रकारचे स्वाध्याय निवडतो आहे ह्याकडे बारकाईने लक्ष ठेवावे.
- ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागलेली आहे अशांकडे वैयक्तिक लक्ष पुरवून त्यांना अधिकाधिक आव्हानात्मक स्वाध्याय सोडविण्यास उद्युक्त करावे.

Popular Posts