Thursday, July 1, 2010

बालमानसशास्त्र आणि अध्ययनप्रक्रिया - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 14

लहान मुले शिकतात म्हणजे काय होते? बालमानसशास्त्रातील आधारभूत संकल्पना आणि लहान मुलांच्या शिकण्याचा काय संबंध आहे?
शिकणे म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता येणे. विचारांची किंवा क्रियांची मालिका कशी असावी हे एखादे मूल (किंवा व्यक्ती) तर्कशुद्ध विचारातून ठरवू शकते. असा विचार करण्याची क्षमता सामाजिक सुसंवादातून साध्य होते. मुले एकमेकांशी किती बोलतात, एकमेकांमध्ये किती मिसळतात किंवा बाई त्यांच्याशी किती बोलतात ह्यावर पूर्वप्राथमिक वर्गात हा सुसंवाद अवलंबून असतो. ज्या मुलांना इतर मुलांशी (किंवा माणसांशी) बोलण्याची, त्यांच्यात मिसळण्याची संधी मिळत नाही त्या मुलांमध्ये तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता लवकर विकसित होत नाही.

असे का घडते?
अनुभवातील वास्तवाची सापेक्षता आणि वैयक्तिक दृष्टिकोन ह्यांची तुलना करून त्यातील अन्योन्य संबंध मूल सामाजिक सुसंवादातून ताडून पहात असते व तेच त्याचे शिक्षण असते. सापेक्षतेसाठी त्याला अन्य व्यक्तीच्या त्याच अनुभवावरील प्रतिक्रियेची गरज भासते. स्वतःची प्रतिक्रिया दुसऱ्याच्या प्रतिक्रियेशी ताडून पहाण्यासाठी हा “दुसरा कोणीतरी” हजर असावा लागतो.

शिकण्यासाठी सामाजिक सुसंवाद अनिवार्य आहे का?
कोणत्याही क्षेत्रात जाणून घेण्याची (ज्ञानग्रहणाची) प्रक्रिया ही सुसंवादाची प्रक्रिया असते. ह्या सुसंवादात, शिकणाऱ्याच्या अहंभावाचा लोप होतो. किंबहुना आपल्या अहंभावाचा लोप होऊन त्याला एखाद्या वस्तुनिष्ठ संदर्भाचे तादात्म्य लाभते तेव्हाच आपण काही शिकू शकतो. (एखादे कठीण गणित/उदाहरण आपल्याला समजल्यावर देहभान हारपण्याचा क्षण कसा येत असेे ते आठवून पहा. आपण जेव्हा काही समजून घेत असतो तेव्हा हीच प्रक्रिया कमी-अधिक उत्कटतेने घडत असते. ती अनायासे घडत असल्याने प्रत्येकवेळी ती आपणास जाणवत नाही इतकेच.)  

पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेचा ह्या संकल्पनेशी कसा संबंध आहे?

आपल्या (किंवा मुलाच्या) मनाने तर्काच्या आधारे विविध संबंधांचे (उदाहरणार्थ, दृश्य-द्रष्टा संबंध) केलेले अनुमान हे ह्या सुसंवादाचे (साध्याचे) एक साधन असते आणि तो त्याचा परिणामही असतो. जन्मल्यापासून ह्या साधनेला सुरुवात होते. बाई वर्गात मुलांशी गप्पा मारत असतात त्यावेळी त्यांना ह्या साधकाच्या (मुलाच्या) सिद्धतेचा अंदाज आणि पडताळा घेता येतो.

वरीलप्रमाणे सुसंवादाची अधिकाधिक संधी देणाऱ्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता अर्थातच जास्त असते. ह्या सुसंवादाला पोषक असे पर्यावरण निसर्ग, व्यक्ती आणि वस्तू ह्यांच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यावर पूर्वप्राथमिक शिक्षणाचा भर असायला हवा. 

वैयक्तिक बाबी आणि सामाजिक बाबी ह्यांच्यामधील फरक न कळल्याने सुसंवाद साधण्यात अडथळे येतात (मोठ्या माणसांच्या बाबतीतही हे खरे आहे). हे अडथळे फार वाढले की सामाजिक स्तरावरील ह्याचे प्रकटीकरण भांडणांमधून दिसते तर वैयक्तिक स्तरावर अडथळ्यांचे अस्तित्व उघड जाणवले नाही तरी ज्ञानग्रहणातील असमर्थतेतून ते व्यक्त होतात.

No comments:

Post a Comment

Popular Posts