Sunday, December 20, 2009

लेखनकलेची आराधना

ईश्वराच्या आराधनेसाठी तंत्रांची निर्मिती ही भारताची सिद्ध परंपराच आहे. लेखनासारख्या एखाद्या कलेसाठीही तंत्रज्ञानाची कास उपयुक्त ठरत आहे. लेखकांना उपयुक्त अशी वायरायटर सारखी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत परंतु बहुतांशी ती लिहिलेल्या मजकुराचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्यासाठी आहेत.

विद्यार्थ्यांना आणि नवोदित लेखकांना ब्लॉग्ज लिहिण्यामुळे आणि सोशल नेटवर्क साईट्‌सवर लेखन केल्यामुळे लेखनाचा चांगला सराव होतो आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढीस लागतो असे निदर्शनास आले आहे. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील तीन हजार विद्यार्थ्यांची पाहणी केली असता जी मुले ब्लॉग्ज लिहितात त्यांच्यापैकी एकसष्ट टक्के आणि जी मुले सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर लिहितात त्यांच्यापैकी छप्पन्न टक्के मुलांमध्ये असा आत्मविश्वास विकसित झाल्याचे आढळले. ऑनलाइन लेखन करणारी ही मुले कथा, पत्रे, दैनंदिनी आणि गीते लिहिण्यातही तरबेज झाल्याचे आढळले.

संशोधनाचा हा दावा अर्थातच सर्वांना मान्य होण्यासारखा नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि संगणक अशा यंत्रांमुळे सर्जनशीलतेची हानि होते असे बऱ्याच जणांचे मत आहे. असे असले तरी आता "लेखन' ही क्रियाच संगणकाशी निगडित झाल्याने ह्या तंत्रज्ञानाच्या आधारे लेखनाचा सराव विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

Wednesday, December 16, 2009

शिस्त लावण्याचे उपाय - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 12

विद्यार्थ्यांना "शिस्त लावता येण्याचे' काही तंत्र आहे का?
विद्यार्थ्यांच्या "बेशिस्तीची' विविध कारणे आपण ह्या आधीच्या नोंदीमध्ये थोडक्यात पाहिलेली आहेत. 'Discipline' ह्या इंग्लिश शब्दाचा अर्थ शिकणे असा होतो. (Disciple = शिष्य). त्यामुळे शिस्त ही ‘लावण्याची' गोष्ट आहे हे अर्वाचीन आणि प्राचीन विद्वानांना पटते आहे असे दिसत नाही. शिक्षकाची भूमिका 'अधीक्षका'ची झाली त्यामुळे लष्करी शिस्तीची संकल्पना शिक्षणक्षेत्रात आली. "अथ आत्मानुशासनम्‌' अशा आदर्शवादापासून समाज दूर झाला की शिक्षकाचा नैतिक अधिकार स्वयंसिद्ध रहात नाही त्याला उसन्या पेडस्टलची किंवा दंडाधिकाराची गरज भासते.
मानसशास्त्रातील विविध मतप्रवाहांचे विविध काळी प्राबल्य होते असे आढळते. मानवी वर्तणुकीवर ताबा मिळवण्याच्या तंत्रांचे त्या मतांनुसार प्रतिपादन होत राहिले. सध्या अशा तंत्रांमध्ये न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग किंवा "एनएलपी' चा बराच बोलबाला आहे.
रिचर्ड बॅंडलर आणि जॉन ग्राइंडर हे ह्या संकल्पनेचे जनक होत. Frogs into Princes ह्या त्यांच्या लोकप्रिय पुस्तकातून ह्या संकल्पनेचा प्रसार झाला. मज्जासंस्था आणि भाषा ह्यांच्यातील सहयोगातून वागणुकीवर प्रभाव पडतो किंवा पाडता येतो अशा स्वरूपाचे हे गृहीतक आहे आणि त्याच्या आधारे तयार केलेली उपचारपद्धती अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांवर उपाय असल्याचा दावा करण्यात येतो. image
हे तंत्र अपेक्षेनुसार वादविवादांच्या भोवऱ्यात आहेच. आदर्शवादी विद्वान आणि परंपरावादी विचारांचे समर्थन करणारे असे दोन टोकांचे लोक आपल्या अनुशासनपद्धतीसाठी ह्या तंत्राची कास धरावी असे म्हणतात हे विशेष. एनएलपी विषयी सोप्या शब्दात माहिती देणारे हे संकेतस्थळ अवश्य पहावे.
साचेबंद वागणूक नाकारणारे (= बेशिस्त) विद्यार्थी तसे का वागतात ह्याची अनेक प्रकारची कारणे असल्याने सर्वांना "रुळावर आणण्यासाठी' एकाच प्रकारचे (उदाहरणार्थ भाषिक क्लृप्तीचे) तंत्र वापरता येईल हे शक्य वाटत नाही. अनेक अनाक्रमक तंत्रांपैकी ते एक असू शकते. विद्यार्थ्यांने झापडबंद विचाराचे न होता त्याची विवेकबुद्धि शाबूत रहावी आणि त्याच्या आधारे त्याला स्वैराचारावर मात करता यावी असा आदर्शवादी विचार आहे.
विद्यार्थ्याला, मग तो बेशिस्त असो वा नसो, विचार करायची सवय लागायची असेल तर मुळात शिक्षकाला विचार करण्याचे वावडे असता कामा नये. झापडबंद किंवा टोपल्या टाकणाऱ्या शिक्षकांना विचार करण्याचा आळस असतो किंवा सवय नसते. ती सवय जर त्याने अंगी बाणवली तर त्याच्या विद्यार्थ्यांपुढे त्याचे एक उदाहरण राहील आणि त्यातून विचारांची सवय त्यांना लागू शकेल व यथावकाश त्यांचा प्रवास आत्मानुशासनाकडे होऊ शकेल.
अशी ही चिकाटीने साध्य करायची दीर्घ प्रक्रिया आहे. एका वर्षापेक्षा अधिक काळ एकाच वर्गाला शिकवणारे शिक्षक त्या वर्गाचे चांगले नियंत्रण का करू शकतात ह्यामागच्या कारणांपैकी हे महत्त्वाचे कारण आहे. कारण विद्यार्थ्यांना शिक्षकाची पुरेशी ओळख पटण्यास आणि चांगुलपणाची प्रेरणा घेण्यास आवश्यक वेळ मिळतो. बडगा उगारून किंवा एखाद्या उसन्या "तंत्राने' अल्पकालीन यश मिळेलही व त्या दृष्टीने तंत्रांचा डोळस वापर अवश्य करावा पण शाश्वत परिणामासाठी "उप-देशा'ला (शब्दशः, गुरुच्या सान्निध्यात अधिकाधिक काळ राहण्याला) पर्याय नाही.

Saturday, November 14, 2009

बेशिस्तीची कारणे - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 11

विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणे कोणती ?

ह्या प्रश्नाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे लहान लहान भाग करून त्याचा विचार करू. बेशिस्त नेमके कशाला म्हणावे यापासून सुरुवात आहे. सध्या त्या विषयात न शिरता त्यावर सर्वसाधारण एकमत आहे असे समजूया. कारणे अनेक प्रकारची आहेत. बेशिस्तीला कारण कोण आहे यावर कारणे कोणत्या प्रकारची आहेत हे ठरते.

विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीला स्वतः विद्यार्थी, त्यांचे पालक/सामाजिक परिस्थिती, शिक्षक आणि शाळा हे चार प्रमुख घटक कारणीभूत असतात. ह्या प्रत्येक घटकातील दोष किंवा उणीवा अंतिमतः विद्यार्थ्यांमधील "बेशिस्ती'च्या स्वरूपात व्यक्त होतात. विद्यार्थ्याची एखादी वागणूक आपल्याला आवडत नसेल तर त्यामागे वरील चारांपैकी नेमक्या कोणत्या घटकाचा दोष जास्त आहे ह्याचा वस्तुनिष्ठपणे शोध घेण्याची सवय शिक्षकाने लावून घ्यायला हवी.

विद्यार्थ्यांशी संबंधित कोणते घटक शिक्षकाने त्यांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करताना विचारात घ्यावे?
सरसकट सर्व विद्यार्थ्यांसाठी अमूकच घटक अमूक कार्य करतात असे मानणे योग्य नसते. तरीही काही ठोकताळे आणि निरीक्षणे खाली दिलेली आहेत :

विद्यार्थ्याच्या वयाशी निगडित घटक
वाढत्या वयासोबत -

  • विद्यार्थ्याच्या शिक्षकाकडे असलेल्या मागण्या आणि शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षा बदलतात.
  • विद्यार्थ्यांचे एकमेकांशी जे नाते असते त्यात बदल होतो.
  • वर्गाच्या दृष्टीने आपली प्रतिष्ठा काय असावी याबाबत विद्यार्थ्याच्या अपेक्षा उंचावतात.
  • विद्यार्थी अधिक सशक्त आणि थोराड होतात.
  • प्रौढांच्या वागणुकीबाबत ते अधिक टीका करू लागतात.
  • स्वतःच्या अपयशाबद्दल प्रौढांना जबाबदार धरण्याची त्यांची प्रवृत्ती वाढते.
  • विद्यार्थ्यांची संवेदनक्षमता वाढते.
  • सामाजिक अस्थैर्याने ते जास्त अस्वस्थ होतात.
  • विद्यार्थ्याच्या क्षमतेशी निगडित घटक

    • अधिक क्षमतेच्या विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करावा असे वाटत असते.
    • भिन्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून भिन्न वागणूक अपेक्षित असते. (जसे; काहींना संयम आणि सहानुभूती हवी असते)
    • आपल्या क्षमतेच्या पातळीनुसार विद्यार्थ्याचे स्वतःच्या यशाचे आणि अपयशाचे निकष बदलतात.
    • विद्यार्थ्यांना आपल्या विभिन्न क्षमतांशी सुसंगत अशा विभिन्न सुविधांची आणि उपकरणांची गरज असते.

    विद्यार्थ्याच्या लिंगाशी निगडित घटक
    विद्यार्थी मुलगा आहे की मुलगी आणि समाजात स्त्री-पुरुषांच्या आदर्श भूमिका कोणत्या मानल्या जातात याच्याशी निगडित घटक.
    उदाहरणार्थ;

    • प्राथमिक शाळेत मुली शिक्षकांशी जास्त सहकार्य करतात.
    • मुली लवकर वयात येतात.
    • शिक्षकांच्या मुलांकडून आणि मुलींकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात (परंतु चांगले अनुभवी शिक्षक तसे जाणवून देत नाहीत.)
    • वाढत्या वयानुसार मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या विषयात रस वाटू लागतो.
    • मुली भावनांच्या प्रकटनावर भर देतात तर मुले भावना शारीरिक हालचालींमधून (मस्ती करणे) व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात.

    विद्यार्थ्याच्या सामाजिक - आर्थिक परिस्थितीशी निगडित घटक
    (विश्लेषण करताना सामाजिक-आर्थिक घटकांना जरुरीपेक्षा जास्त महत्त्व दिले जाण्याची शक्यता असते ह्याचे भान नेहमी असायला हवे.)

    • साधारणतः गरीबांची मुलांना दबून वागण्याची तर श्रीमंतांच्या मुलांना उन्मत्तपणे वागण्याची सवय लागते. (जितक्या लहान वयापासून मुले एकत्र असतात, उदाहरणार्थ शिशुवर्गापासून,  तितका हा दोष कमी होतो)
    • शाळेमध्ये शिकवण्यात येणारी मूल्ये सधन वर्गाच्या चालीरीतींशी सुसंगत असण्याची शक्यता जास्त असते.
    • सधन मुले जास्त क्षमतेच्या गटात तर निर्धन मुले कमी क्षमतेच्या गटात आहेत असे मानण्याकडे शिक्षकांचा कल असतो.
    • चांगल्या वागणुकीचे चांगले फळ मिळण्यासाठी वाट पाहण्यास सधन मुले तयार असतात. निर्धन मुलांना हा विश्वास वाटणे अवघड असते.

    समाजगटविशिष्ट सांस्कृतिक घटक
    (विश्लेषण करताना काही घटकांना, उदाहरणार्थ, सामाजिक-आर्थिक घटकांना जरुरीपेक्षा जास्त महत्त्व दिले जाण्याची शक्यता असते. सांस्कृतिक घटकांबाबत तर ह्याचे भान नेहमी असायला हवे.)

    • काही समाजगटांमध्ये धार्मिक आणि नैतिक संकेत जास्त काटेकोरपणे पाळले जातात. (उदाहरणार्थ, शाकाहार-मांसाहार/एकत्र खाण्यापिण्यास मज्जाव)
    • धार्मिक कृत्ये आणि कर्मकांडे ह्यांचा काही विद्यार्थ्यांच्या शाळेतील वागणुकीवर परिणाम होऊ शकतो. (उदाहरणार्थ उपवास करणे)
    • दोन समाजगटांमध्ये पारंपारिक वैर असणे
    • एका गटाच्या भाषेची/बोली भाषेची दुसऱ्या गटाकडून टिंगल होणे
    • सामाजिक आणि भावनिक संयम किती प्रमाणात असावा ह्याबाबत भिन्न संस्कृतींचे भिन्न निकष असणे.

  • Thursday, October 8, 2009

    प्रश्नपेढी

    प्रश्नपेढी तयार करणे हा धडपड्या शिक्षकांचा एक लाडका उपक्रम आहे. मीही माझ्या दुसऱ्या अनुदिनीवर प्रश्नांच्या विविध प्रकारांची थोडक्यात ओळख करून देण्याचा केलेला प्रयत्न येथे आणि येथे पाहता येईल. बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय हे आजच्या तरुण शिक्षकांना कदाचित सांगता येणार नाही. पण केबीसी टाईप प्रश्न (= कौन बनेगा करोडपती) (क्षमस्व; पण आमच्यासारख्या अडाणी लोकांसाठी कंसात असे समजावून द्यावे लागते) असे म्हटले की लगेच समजते. एक अध्यापन साधन म्हणून प्रश्नांचा कसा वापर करता येतो यावर अजय भागवत यांनी लिहिलेला एक सुंदर लेख येथे पाहता येईल.
    योग्य प्रश्न विचारणे हे खरोखरच अतिशय महत्त्वाचे आहे. विचारवंतांना पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातूनच मानवाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. ह्या तत्त्वज्ञांना आणि शास्त्रज्ञांना पडणारे प्रश्न त्यांनी स्वतःपाशी न ठेवता एकमेकांना विचारावेत आणि त्यासाठी किमान शंभरेक विद्वानांना एका खोलीत कोंडून ठेवावे असे जेम्स ली बायर्स ह्या विख्यात चित्रकाराच्या मनात आले आणि लगेच तो त्या कामाला लागला. त्यातूनच एज फाऊंडेशनच्या जागतिक प्रश्न केंद्राची निर्मिती झाली. 1998 पासून ह्या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे. दरवर्षी एक प्रश्न विचारण्यात येतो. त्याची उत्तरे देणारे तज्ञांचे आणि शास्त्रज्ञांचे लेख आपल्याला ह्या संकेतस्थळावर वाचावयास मिळतात. संपादनाची आणि प्रकाशनाची जबाबदारी एज फाऊंडेशनचे संस्थापक जॉन ब्रॉकमन सांभाळतात.
    यावर्षीचा प्रश्न आहे, WHAT WILL CHANGE EVERYTHING?  त्याला केविन केली यांनी "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' हे उत्तर दिले आहे तर हॉवर्ड गार्डनर यांनी "जनुकशास्त्र आणि मानसशास्त्र ह्यांच्या सहयोगातून हुशारीचा शोध' असे उत्तर दिले आहे. स्टीव्हन पिंकर ह्यांनी "पर्सनल जेनॉमिक्स' असे उत्तर दिले आहे. तुमच्या जीनोमचे स्विक्वेन्सिंग तुम्हाला आता  (3.5 लाख डॉलर्सना) मिळू शकते. स्टीव्हन श्नायडर ह्यांनी ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळण्याचा धोका जवळ येऊन ठेपल्याचे सांगितले आहे. या वर्षीचे असे 151 लेख आहेत. 1998 सालापासूनचे असे अनेक लेख तुम्ही ह्या संकेतस्थळावर वाचू शकता. हा खजिना म्हणजे खरी प्रश्नपेढी (आणि उत्तरपेढीसुद्धा) आहे.

    Thursday, October 1, 2009

    पृथ्वीचे आक्रंदन आणि बॅरी कॉमनर

    बॅरी कॉमनर हे अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी असून Centre for the Bilogy of Natural Systems ही संस्था त्यांनी स्थापन केली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढविलेली होती. अणुचाचण्यांना त्यांचा प्रखर विरोध आहे. रीगन आणि बुश यांनी प्रदूषण टाळण्यात कुचराई केल्याबद्दल त्यांच्यावर कॉमनर यांनी टीका केलेली आहे.
    पर्यावरणाच्या ऱ्हासाचा अभ्यास करणे फॅशनेबल नव्हते तेव्हापासून बॅरी कॉमनर ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही प्रकारच्या देशांमधील पुरोगामी विचाराच्या लोकांना भावलेले असे त्यांचे हे पुस्तक आहे. Making Peace With The planet हे बॅरी कॉमनर ह्यांचे पुस्तक गेल्या दशकात बरेच गाजले. पुस्तकाची अनेक परीक्षणे झाली.

    Sunday, September 13, 2009

    वर्गातील शिस्त : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 10

    शैक्षणिक गुणवत्तेसाठी वर्गात शिस्त राखणे अनिवार्य नाही का? बदलत्या सामाजिक परिस्थितीत अशी शिस्त राखणे शिक्षकांना किती शक्य होते?

    हा प्रश्न सध्याच्या काळात जास्त तीव्र झालेला आहे असे वाटत असले तरी तो सार्वकालिक आहे. काळानुरूप प्रश्नवेगवेगळ्या भाषेत व्यक्त होत आलेला आहे. शिक्षकाने समंजस असण्यावर भर वाढत गेला तसतशी ही भाषा बदलतगेली आहे.

    Friday, September 11, 2009

    चांदोबा

    माझ्या पिढीचं (माझ्या आधीच्या आणि नंतरच्या पिढ्यांचंही) बालपण समृद्ध करण्यात फार मोठा वाटा "चांदोबा' चा आहे. दक्षिणेकडील आणि बहुभाषिक प्रकाशन असूनही "चांदोबा'चा तोंडवळा अस्सल मराठमोळा आहे. वेताळाच्या गोष्टी असोत, परोपकारी गोपाळाच्या असोत की "भयानक दरी'सारख्या चांदोबा-स्पेशल गोष्टी असोत चित्रा आणि शंकर ह्यांच्या चित्रांनी नटलेल्या ह्या सर्व साहित्याने माझ्या भावविश्वात घर केलेलं आहे. व्हिडिओimage गेम्सच्या आणि मल्टिचॅनेल करमणुकीच्या आजच्या जगातही चांदोबा मुलांना श्रेष्ठ बालसाहित्य देऊ शकेल यात मला यत्किंचितही शंका नाही. मात्र आपण पालकच त्याला विसरतो आहोत का याची शंका येते.

    माझ्या अनेक मित्रांकडे चांदोबाचे जुने अंक बाईंड केलेले आहेत. इतरांकडून हेळसांड होऊ नये म्हणून हा खजिना हे मित्र कंजूषपणे जपत असतात. सहज म्हणून चांदोबाचा नेटवर सर्च घेतला आणि मराठी चांदोबाच्या 14 वर्षांच्या अंकांचा खजिना येथे सापडला. हे अंक ऑनलाइन विनामूल्य वाचता येतात. तुम्हीही जर चांदोबाचे माझ्यासाखेच फॅन असाल तर चंदामामा प्रकाशनाला प्रतिसाद पाठवा आणि मराठीचे आणखी अंक उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करा.

    आणि हो. वर्षाला 240 रुपये ही चांदोबाची वर्गणीही फार वाटू नये.

    Friday, August 21, 2009

    अध्ययनाच्या प्रेरणा : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 9

    प्रश्न : अध्यापनाचे धोरण शैक्षणिक गुणवत्तेला पोषक राहण्यासाठी काय करावे?

    उत्तर : एखाद्या विषयाचे अध्यापन करणे म्हणजे केवळ त्या विषयाचे पाठ्यपुस्तक शिकवणे इतकेच नाही. तो विषय विद्यार्थ्याला आपणहून शिकता येईल अशा क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित करणे महत्त्वाचे आहे. स्वतःहून एखादी गोष्ट शोधून काढण्यात मुलांना मिळणारा आनंद खूप मोठा आहे. आईने हातांमध्ये लपवलेला चेहराही "शोधून" काढताना बाळाला कोण आनंद मिळतो!

    विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाच्या अशा प्रेरणा विकसित करण्यासाठी आज अनेक साधने आणि माध्यमे उपलब्ध आहेत. (उदाहरणार्थ, गणिताच्या शब्दकोशाचे हे संकेतस्थळ किती साधे आणि तरीही किती परिणामकारक आहे हे पाहता येईल.) त्यांचा कल्पक वापर करण्याकडे शिक्षकाचा प्रयत्न असावा. असे लहान स्वाध्यायाच्या स्वरूपातले प्रकल्प वैयक्तिक स्तरावर किंवा गटागटांना वाटून देता येतील.

    शिक्षणाचे उद्दिष्ट काय? ह्या प्रश्नाची अनेक उत्तरे संभवतात. "पुढील शिक्षण घेता येण्याची क्षमता विकसित करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट होय.' असे एक सार्वत्रिक उद्दिष्ट सांगता येते. स्वतः शिकण्यातला, एखादे तथ्य किंवा एखादी गोष्ट स्वतः शोधून काढण्यातला आनंद जर विद्यार्थ्याला घेता आला तर शिक्षकाचे ते फार मोठे यश मानायला हवे.

    Tuesday, May 26, 2009

    छांदिष्ट - 2

    या अगोदरच्या नोंदीमध्ये आपण छांदिष्टपणाचा एक नमुना पाहिला. आता खरे छांदिष्ट म्हणजे शब्दशः 'छांदिष्ट' कसे असतात याची दोन उदाहरणे पाहू. मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा उल्लेख यापूर्वीही मी केलेला आहे. या संकेतस्थळावर "धोंडोपंत' हे व्यासंगी रसिक गृहस्थ छन्दशास्त्राविषयी अतिशय चांगली माहिती देऊन चर्चा घडवून आणीत असतात. "उपक्रम' ह्या संकेतस्थळावर "धनंजय' यांनीही नव्या कवितेतील मात्रागणनाच्या अनुरोधाने चांगली चर्चा सुरू केलेली आहे.
    मिसळपावावर धोंडोपंतांनी एकेका वृत्ताची माहिती देण्याच्या मिषाने उत्तमोत्तम कवितांना उजाळा देण्याचा सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे. कवि ग्रेस ह्यांच्या एका अप्रतिम कवितेचे उदाहरण देऊन त्यांनी 'उद्धव' ह्या जातिवृत्ताबद्दल केलेले लेखन अवश्य वाचावे.
    छंदयति (= आल्हादयति) इति छंदः अशी एक व्युत्पत्ति आहे आणि छंदांसि च्छादनात्‌ (= आच्छादनात्‌ )- अर्थात कवितेच्या आशयाचे संरक्षण करणारी रचना म्हणजे छंद अशी यास्काचार्यांची व्युत्पत्ति आहे. ही व्याख्या पूर्णपणे प्रत्ययास यावी असे उद्धव हे वृत्त आहे. आर्तता आणि कारुण्य ह्यांच्या परिपोषासाठी आणि संवर्धनासाठी विविध कवींनी ह्या वृत्ताचा वापर केलेला आहे. (मात्र अमूक मात्रासमूह म्हणजे अमूकच चाल, अमूकच रस असे बंधन असायचे कारण नाही. रागरागिण्यांचा अपारंपारिक वापर जसा प्रतिभावंतांनी विभिन्न भाववृत्तींच्या निर्मितीसाठी केलेला आहे तसेच छंदांच्या बाबतीतही खरे आहे).
    "उद्धवा शांतवन कर जा
    त्या गोकुळवासी जनांचे'
    मध्वमुनीश्वर ह्यांच्या ह्या प्रसिद्ध कवितेमुळे ह्या वृत्ताला उद्धव हे नाव मिळाले असावे. श्रीकृष्णाला अक्रूर गोकुळातून मथुरेला घेऊन आला. त्याच्या विरहाने आकांत करणाऱ्या गोकुळवासीयांचे सांत्वन करण्याची जबाबदारी कृष्णाने उद्धवावर सोपवली त्या घटनेवरील हे काव्य आहे.
    ""बा नंद यशोदा माता
    मजसाठी त्यजतील प्राण
    सोडूनि प्रपंचा फिरतील
    मनीं उदास रानोरान""
    गोकुळवासीयांच्या आकांताच्या कल्पनेने कृष्णही व्यथित झालेला आहे. गोपींविषयी तर तो म्हणतो,
    ""तिळतुल्य नाही मनिं दुगल्या
    दृढनिश्चय करुनिं तगल्या
    बहुधा त्या नसतील जगल्या
    भंगले मनोरथ ज्यांचे ।। उद्धवा...।।''
    उद्धव जातितील अनेक काव्ये आपल्या परिचयाची आहेत. उद्धव जातिचे चरण वापरून तयार केलेली अर्धसम वृत्तेही अतिशय प्रभावी आहेत.
    उदाहरणार्थ, अक्रूर ह्या जातिवृत्तात पहिला चरण (। प । प । - -) असा अठरा मात्रांचा आहे तर दुसरा चरण उद्धव जातिचा (- । प । - -) म्हणजे चौदा मात्रांचा आहे. या वृत्तातली श्री. ग. ह. पाटील ह्यांची “श्रावणबाळ’’ ("शर आला तो धावून आला काळ') ही कविता शिकताना तर सद्गदिद होऊन स्फुंदणारे शाळकरी विद्यार्थी माझ्या आणि अगोदरच्या पिढीतील बहुतेकांना आठवत असतील.
    अक्रूर जातिचे हे सामर्थ्य स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी "ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ह्या आपल्या काव्यात अजरामर केले आहे. वीर सावरकर ह्या चित्रपटात या कवितेला अक्रूर जातिवृत्ताच्या पारंपारिक चालीच्या आधारे सुधीर फडके ह्यांनी दिलेली चाल, चित्रपटात स्वातंत्र्यवीरांची तळमळ प्रकट करणारा उत्कट परिणाम साधून जाते आणि नंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते.
    उद्धव जातिचा उपयोग करून "नृपममता' हे सुंदर वृत्त तयार करण्यात आलेले आहे. उद्धव जातिच्या चरणापुढे एक "र' गण (गुरु-लघु-गुरु) ठेवून ( - । प । - -।- . – ) ते तयार होते. गोविंदाग्रजांची 'प्रेम आणि मरण' ही गाजलेली कविता नृपममता जातिमध्ये आहे.
    "तो हसे जरा उपहासे
    मग स्वयेचि वदला त्रासे । त्यांप्रति ।।
    निष्प्रेम चिरंजीवन ते।
    जगी दगडालाही मिळते । धिक्‌ तया ।।'
    किंवा
    "ही त्याची स्थिती पाहुनिया
    ती दीड वितीची दुनिया । बडबडे ।।
    कुणी हसे करी कुणी कीव
    तडफडे कुणाचा जीव । त्यास्तव ।।
    अशा अनेक अविस्मरणीय ओळी गोविंदाग्रजांनी ह्या कवितेत लिहिलेल्या आहेत. कडव्याचा शेवट करताना तर त्यांनी बहार केली आहे. भवानी जातिचा खंडित चरण शेवटी वापरला आहे.
    "निंदती कुणी त्याप्रति, नजर चुकविती, भितीही कोणी
    जड जगास अवजड गोणी । होइ ती ।।'
    किंवा
    "तो योग खरा हठयोग प्रीतिचा रोग लागला ज्याला
    लागते जगावे त्याला । हे असे ।।'
    असो. छांदिष्टपणाला अंत नाही. मात्र श्री. धनंजय ह्यांनी त्यांच्या उपक्रमाने आणि श्री. धोंडोपंत ह्यांनी त्यांच्या छंदोवृत्तीने दिलेला आनंद शब्दातीत आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन लेखन आवरते घेतो.

    Monday, March 16, 2009

    संपुष्ट

    छांदिष्ट माणसे अनेक आहेत आणि तसेच त्यांचे नानाविध छंदही.  काही छंद संग्रह करण्याचे असतात. काडेपेट्यांपासून पोस्टाची तिकिटे जमवण्यापर्यंत अनेक.

    पुस्तकप्रेमींना पुस्तकं जमवण्याचा छंद असणं स्वाभाविकच आहे. हे वेड जसजसं पराकोटीला जायला लागेल तसतशी जुनी पुस्तकं, ठराविक लेखकाची पुस्तकं, ठराविक आवृत्ती आपल्याकडे असल्याचा अभिमान वाटायला लागतो.

    संतांनी असंग्रह वृत्ती जोपासण्याची गरज आहे असं कितीही कळकळीनं सांगितलं तरी त्यातून पळवाटा असतातच. ग्रंथसंग्रह करणे हे दासबोधात सत्त्वगुणाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे ह्याचा मीही अधूनमधून आधार घेत असतो.

    image

    संग्रह करूनही केला नाही असं म्हणण्याची सोय आता या महाजालामुळे झालेली आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठांचा संग्रह करणारी ही साईट पाहिली तेव्हा भरून पावलो असं मला वाटलं. मराठी पुस्तकांच्या वाटेला हे भाग्य कधी येणार याची आता वाट पाहूया. लवकरच एखादी छांदिष्ट व्यक्ती- हवंतर वल्ली म्हणा- मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा खजिना महाजालावर हजर करील आणि नुसते तिळा उघड असे म्हटले j2की खजिन्याची गुहा उघडेल यात मला तिळमात्र शंका नाही.  

    पद्मा सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं माधव आचवलांच्या जास्वंद ह्या पुस्तकाचं मुखपृष्ठ नमुना म्हणून सोबत दिलेलं आहे. मराठीत दलालांपासून अवचटांपर्यंत आणि र. कृ. जोशींपासून अच्युत पालवांपर्यंत उत्तमोत्तम चित्रकारांनी नटवलेली मुखपृष्ठांची समृद्ध दुनिया आहे. पुस्तकाच्या आशयाचा, अंतरंगाचा वेध घेणारी त्यावर समर्थपणे स्वतंत्र भाष्य करणारी अन्वर्थक आणि समर्पक मुखपृष्ठे मराठीत खरोखरच अनंत आहेत.     

    नेव्हिल श्यूट च्या पॅन बुक्सच्या एका आवृत्तीत सर्व पुस्तकांची मुखपृष्ठे सुंदर ऑइल पेंटिंग्जची होती. त्यातली बरीचशी मला मिळाली.

    जेन ऑस्टिनच्या पुस्तकांच्या पेंग्विन प्रकाशनाने काढलेल्या गिफ्टबॉक्स आवृत्तीत मुखपृष्ठांवर व्हिक्टोरिimageयन स्त्रियांची व्यक्तिचित्रणे आहेत. सुदैवाने ह्या आवृत्तीतील सर्व पुस्तके मी मिळवू शकलो. त्यातले प्राईड अँड प्रेज्युडिस एका मैत्रिणीने निष्काळजीपणे हरवले तेव्हा मी खूप हळहळलो. पूर्वी कुठे नाही तर काळबादेवीच्या न्यू अँड सेकंडहॅंड बुक स्टॉलमध्ये असे काही मिळण्याची आशा होती. आता तीही उरली नाही. 

    पेंग्विन (आणि पेलिकन) पुस्तकांची मुखपृष्ठे हा खरंतर स्वतंत्र संशोधनाचा विषय होण्यासही हरकत नाही. अशा निवडक मुखपृष्ठांसाठी हे संकलन अवश्य पहावे.

    Sunday, February 8, 2009

    सहजपणाने गळते ‘मी’पण

    मध्यंतरी महाजालावरील वाचन अशी एक नोंद मी ह्या ब्लॉगवर केलेली आहे. महाजालावरील ह्या मुशाफिरीत वाचनीय असे काही आढळलेले मी तेथे नोंदविलेले आहे.

    आपल्या मनाच्या सकारात्मक विचार करण्याच्या ताकदीवर विश्वास असेल तर गंमत म्हणून ही साईट पाहण्यास हरकत नाही.

    "Blogging : Never before have so many people with so little to say said so much to so few ."

    ही ब्लॉगिंगची व्याख्या हा त्यातलाच एक मासलेवाईक नमुना आहे.

    पण सर्व नकारात्मक प्रवृत्तींवर मात करतील अशा काही कामे असतात आणि ती पाहून तुमचा अहं पार लयाला जातो.

    माझे ई-स्नेही श्री. अजय भागवत ह्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या दोन साईट्स अशा प्रकारच्या आहेत. वरदा वैद्य ह्यांची विवस्वान ही खगोलशास्त्राविषयी मराठीतून माहिती देणारी अनुदिनी आणि त्यांचीच वातकुक्कुट ही हवामानशास्त्राची ओळख मराठीतून करून देणारी अनुदिनी पाहिली. मराठी भाषा मरणपंथाला लागलेली आहे का? अशी वायफळ चर्चा करीत बसण्यापेक्षा मराठीतून काम करण्यास सुरुवात करावी असा संदेश आपल्या कृतीतून देणा-या ह्या अनुदिनी आहेत. सचिन सखाराम पिळणकर ह्यांची अवकाशवेध ही अनुदिनीही अशीच आहे.

    तात्पर्य - आंग्लाळलेल्या मराठी माणसांचा मराठीतून विज्ञान शिकण्यावर विश्वास राहिलेला नसला तरी त्यामुळे मराठी शास्त्रज्ञ निराश झाले आहेत असे मात्र दिसत नाही. मराठी विज्ञान परिषद पत्रिका आजही ते नेटाने चालवीत आहेत. विज्ञान विषयाची आकर्षक मांडणी मराठीतूनही करता येते ह्यावर आज विश्वास ठेवायला जे मराठी भाषक तयार नाहीत त्यांनी ही पत्रिका अवश्य नजरेखालून घालावी. वर्षाला रु.130/- इतक्या अत्यल्प वर्गणीमध्ये ही पत्रिका उपलब्ध आहे. (पण वर्गणी भरण्याचे कष्ट घ्यावे लागतात). परिषदेचा पत्ता आणि विज्ञान लोकप्रिय करण्याबद्दल परिषदेला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या अनुषंगाने माहिती येथे उपलब्ध आहे.

    असेच अप्रूप मला विश्वास भिडे -Retired and Happy- ह्यांच्या कामाचे वाटते.

    त्यांनी सारे संतसाहित्य महाजालावर आणायचा संकल्प केला असावा अशी शंका येते. हरिदास ह्यांनी येथे अपलोड केलेली कीर्तने पाहिल्यावरही आपण नतमस्तक होतो. असे नेटाने आणि निरलसपणे काम करीत राहण्याची प्रेरणा ह्यांच्यासारख्या मंडळींना होते हे आपले परमभाग्य आहे.

    कोशकार्यासारख्या कामात स्वतःला गुंतवून घेणारी प्रकाशझोतापासून दूर राहून कार्य करणारी माणसे मराठीला नवीन नाहीत हे खरे, पण नव्या तंत्रज्ञानाच्या आधाराने भाषेचे कार्य साधले जाणार आहे हे ओळखून प्रयत्नशील असलेल्या सध्याच्या मंडळींच्या दूरदृष्टीला आणि चिकाटीला दाद द्यायलाच हवी.

    उपक्रम हे संकेतस्थळही मला श्री. अजय भागवतांनी दाखविले तेव्हा त्याचे अस्तित्व समजले. पण माझ्यासारखेच मागासलेले अनेक असतील. हे संकेतस्थळ नेमके कोण चालवीत आहे हे मला शोधूनही सापडले नाही. लोकसंग्रहाची अपार शुद्ध जाणीव आणि प्रखर आत्मनिष्ठ वैराग्य हा ज्ञानेश्वरांचा आदर्श मराठी मनाला नेहमी मोहवतो असे दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेले आहे त्याचा प्रत्यय अनेकदा येतो.

    आपल्या कामाचे अनन्यसाधारण महत्त्व ज्यांनी ओळखले होते अशा काही विद्वानांनी हेतुतः मराठीतून मौलिक लेखन केले. पं. भातखंडे, वि. का. राजवाडे आणि शं.बा.दीक्षित अशी काही नावे ह्याबाबत घेता येतील. आपले लेखन दुर्लक्षिता येणार नाही आणि त्यातील आशय जाणण्यासाठी इतर भाषकांना मराठी शिकण्याची प्रेरणा मिळेल असा सार्थ आत्मविश्वास ह्या मंडळींकडे होता त्यामुळे इंग्रजीत लेखन करणे शक्य असूनही त्यांनी ते टाळले.

    Friday, February 6, 2009

    गुणवत्तेचे निकष : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 8

    सामान्यतः कोणत्या ढोबळ निकषांनुसार संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन केले जाते?

    सामान्यतः सोप्या भाषेत हे निकष असे सांगता येतील :

    • अभ्यासक्रमाची खोली आणि तो राबवण्यातील कार्यक्षमता
    • शिक्षक : विद्यार्थी गुणोत्तर
    • स्वीकारार्हता किंवा मागणी : एका जागेसाठी येणा-या अर्जांची संख्या
    • किती विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करतात ( टक्केवारीपेक्षाही केवळ संख्या महत्त्वाची)
    • शाळेतून/संस्थेतून बाहेर पडल्यावर विद्यार्थ्यांची भविष्यात होणारी प्रगती
    • ग्रंथालय सुविधा
    • प्रयोगशाळा सुविधा image
    • संगणक सुविधा
    • संस्थेची जनमानसातील प्रतिमा / प्रतिष्ठा
    • शिक्षकांची गुणवत्ता
    • स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांचे यश
    • संस्थेला मिळणा-या देणग्या
    • संस्थेची स्रोतसमृद्धि
    • कर्मचा-यांच्या मनातील प्रतिमा
    • आत्मशोधनासाठी उत्पादकता संशोधन
    • इतर संस्थांसाठी सल्लासेवा देण्याची क्षमता

    Popular Posts