Saturday, December 17, 2016

deschooling कडे कल वाढण्यामागची मूळ कारणे कोणती? - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 25

 
डीस्कूलिंगची संकल्पना समजून घेण्यासाठी इव्हान इलिच (
Deschooling Society), पॉल गुडमन (Compulsory Miseducation) आणि एवरेट रेमर (School Is Dead) ह्यांचे साहित्य वाचल्यास मदत होईल.

जर एखाद्या प्राण्याला भूक लागलेली नसतानाही चाबूक मारून सतत खायला लावलं तर त्याची जशी अवस्था होईल तशी अवस्था आजच्या शालेय विद्यार्थ्यांची होते आहे असं अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणतो.

वाचायला कसं शिकवावं हा प्रश्नच नाही असं मज्जासंस्थेचे अभ्यासक म्हणतात. शहरातली मुले तर लिखित शब्दांच्या इतकी संपर्कात असतात की सामान्य मुलांना शब्द आणि त्यांचे लेखन ही सांकेतिक संकल्पना तात्काळ समजायला हवी. पण न समजण्याचं मुख्य कारण असं की ती शाळेत जातात! तिथे त्यांना बक्षिस आणि शिक्षा मिळते ती भलत्याच कारणांसाठी आणि एखाद्या गोष्टीत सहजी रस निर्माण होऊच नये अशी शालेय शिक्षणाची शैली असते. अनेक शाळा अशा असतात की त्या शाळांमध्ये विद्यार्थी जितका जास्त काळ जातील तितका त्यांचा बुद्ध्यांक घसरतो. मागे पडणारे अनेक विद्यार्थी जर रस्त्यावर भटकत राहिले असते तर त्यांचे शिक्षण जास्त चांगले झाले असते असेही संशोधनातून दिसून येते.
 
शाळांमध्ये पैसा ओतला की शाळा सुधारतात ही एक सार्वत्रिक अंधश्रद्धा आहे. पैशाने शिक्षण विकत घेऊ पाहणा-यांसाठी अनेक शाळांमधून अध्ययनाचा स्टंट किंवा तमाशा केला जातो आणि विद्यार्थ्यांचा नैसर्गिक बौद्धिक विकास तेथे खुंटतो. काही शिकणे ही कल्पनाच अशा विद्यार्थ्यांना भयंकर जाचक वाटू लागते. अखेरीस अशा विद्यार्थ्यांना रेमटावून त्यांच्यामधून एकमेकांशी स्पर्धा करणे हा एकमेव कार्यक्रम असलेले शिपुर्डे तयार केले जातात आणि अनेक सामाजिक समस्यांना हे शिपुर्डे नंतर कारणीभूत ठरतात.
 
लोकानुयायी धोरणे, श्रम आणि पैसा ह्यांचा अतोनात अपव्यय, आणि लहान मुलांच्या वैचारिक व भावविश्वाचा निर्दय खेळखंडोबा हे आजच्या औपचारिक शिक्षणाचे अनिवार्य घटक ठरत आहेत. शासकीय स्तरावरील सदोष कायद्यांमुळे आणि भ्रष्ट व्यवस्थेत यशस्वी होणा-या ठरावीक परवानाधारक व्यक्तींना शिक्षकाच्या व्यवसायाचा ठेका मिळालेला असून हे ठेकेदार देतील ते शिक्षण अशी शिक्षणाची सरकारी व्याख्या झालेली आहे. हे कमी म्हणून की काय लोक मेंढरासारखे धंदेवाईक कोचिंग क्लासेसच्या मागे धावत आहेत आणि आपल्या मुलांना क्लासेसमध्ये कोंबून मुलांचे बारीक पीठ पाडण्यात धन्यता मानत आहेत. खरेतर शाळा आणि क्लासेसची उपयुक्तता नोकरी करणा-या आईबापांच्या वाढत्या मुलांसाठी पाळणाघरे (= कोंडवाडे) इतकीच उरलेली आहे.

शालाबाह्य जीवनात विविध प्रकारच्या स्क्रीन्सकडे निर्बुद्धपणे पहात बसणारी मुले आता शाळांमधूनही कल्पनाशून्य स्मार्टबोर्ड लेसन्सचे रतीब जिरवताना दिसतात. रडक्या मुलांच्या तोंडात बोंडले खुपसावे तसे हे `स्मार्ट'बोर्डचे बोंडले मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आजच्या शिक्षकांचे आवडते आणि सोयीस्कर साधन झाले आहे.
 
अंतिमतः ह्या व्यवस्थेतून तयार होणारे अनेक 'उच्चशिक्षित' वैफल्यग्रस्त होत आहेत कारण आपल्याला काहीही येत नाही, आपण खरे काही शिकलेलो नाही हे त्यांना अंतर्यामी माहीत असते आणि ते सत्य त्यांना छळत राहते. घोकण्याची क्षमता असली तरी मेंदूला लागलेल्या चुकीच्या सवयींमुळे त्यांची शिकण्याची क्षमता ते हरवून बसलेले असतात.
 
शालेय शिक्षणाबाबत निराश झालेले विचारी पालक नाईलाजाने डीस्कूलिंग कडे वळत आहेत. पण ती वाट योग्य ध्येयाकडे जाणारी असली तरी चांगल्या शालेय शिक्षणाच्या तुलनेने अतिशय खडतर आहे. शाळेत न जाता विद्यार्थ्याने समाजाभिमुखता जोपासणे अतिशय अवघड आहे. आणि शिक्षण ही तर एक
सामाजिक प्रक्रिया आहे असे मानसशास्त्रीय प्रतिपादन आहे!

आदर्श शालेय समाजाची निर्मिती हे आजच्या काळाचे मोठे आव्हान आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts