Thursday, October 23, 2025

इतिशोध

पद्मगंधा प्रकाशनातर्फे सुमारे 25 वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेले 'इतिशोध' हे इतिहास संशोधक सुरेश जोशी ह्यांचे 172 पानांचे पुस्तक नुकतेच वाचनात आले. लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे संकलन आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत श्री. निनाद बेडेकर म्हणतात, '' इतिशोध हे आत्मचरित्र नव्हे. ऐतिहासिक साधने गोळा करण्यासाठी केलेल्या कष्टमेहनतीची ती एक गाथा आहे, किंवा व्यथा आहे.'' शिलालेख, ताम्रपट, मूर्ती, चित्रे, नाणी, खापरे, कागदपत्रे अशीच इतिहास संशोधनाची साधने असतात. ऐतिहासिक साधने संगृहीत करून ठेवण्यास मिळालेली दृष्टी हे खरे तर ह्या मेहनतीमागचे भांडवल आहे.

श्री. सुरेश जोशी 40 वर्षे अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त होते. पुण्यातील राजा केळकर वस्तुसंग्रहालयाचे क्युरेटर म्हणूनही काही काळ त्यांनी काम पाहिले आहे.

नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील दुर्मीळ, साधनांचा प्रचंड संग्रह त्यांच्या परिश्रमाची, चिकाटीची आणि जिद्दीची साक्ष आहे. हा बहुमोल संग्रह गोळा करताना अनेक व्यक्ती, समाज आणि प्रसंग ह्यांचा श्री. जोशी ह्यांच्या संवेदनशील मनाने घेतलेला शोध असे ह्या 'इतिशोधाचे' स्वरूप आहे. 

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांचा सहवास आणि मार्गदर्शन आणि त्यांच्याशी असलेला घरोबा ह्याविषयी जोशी ह्यांनी समरसून लिहिले आहे. सेतुमाधवराव पगडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. सांकलिया, डॉ. पु. म. जोशी, प्रा. राम शेवाळकर, न. र. फाटक, बाबासाहेब पुरंदरे, अशा अनेक दिग्गजांशी आलेला संबंध आणि किस्से जोशींनी वर्णिलेले आहेत.

संशोधन कार्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देणार्या व्यक्ती दुर्मीळ होत चाललेल्या ह्या काळात श्री. जोशी ह्यांच्यासारख्या माणसांची आगळीवेगळी मुलुखगिरी वेगळी उठून दिसते.

Sunday, October 18, 2020

शिक्षकांनी मुलांसमवेत कसे वागावे?

Online शिक्षणाच्या ह्या जमान्यामध्ये शिक्षक मुलांच्या समवेत असतात असे म्हणणेच धाडसाचे ठरेल. कोविडची साथ उतरली की शाळा सुरू होतील आणि शिक्षक-विद्यार्थी एकमेकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येतील. तो दिवस लवकर उगवेल अशी आशा करूया.

असे असले तरी Online शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक-विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात आहेतच. शिक्षकांनी मुलांसमवेत कसे वागावे? ह्याबाबत सल्ला देणे खूप अवघड आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत 3 जसा तात्त्विक विचार झालेला आहे तितक्या प्रमाणात शिक्षकाच्या वर्तनाबाबत झालेला नाही. प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षक ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे आहेत. ते एकमेकांशी कसे वागतील ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे त्याबाबत काहीही नियम करणे कठीण आहे. काही तंत्रे सांगता येतील 1  पण एक तंत्र एका ठिकाणी यशस्वी झाले तरी दुसरीकडे यशस्वी होईलच असे नाही.

म्हणून ह्यासाठी शिक्षकाने स्वतःचा आत्मविश्वास विकसित करत असतानाच आपली स्वतःच्या सोयीची वैयक्तिक शैली विकसित करणे अपेक्षित आहे.

शिक्षकाकडे एक प्रकारचा 'नैसर्गिक अधिकार' असतो असे अनेकजण मानतात. हा अधिकार संस्कृतीने, परंपरेने दिलेला असतो तर काही प्रभावी व्यक्तींकडे तो जन्मजात असल्यासारखा आणि विशेष जाणवणारा असू शकतो. वस्तुतः प्रत्येक शिक्षकाचे बरे वाईट दिवस असतात. सर्व काळ प्रत्येकजण चांगल्या अनुभवाचीच अपेक्षा करू शकणार नाही. वाईट अनुभवांचा आपल्यावर फार परिणाम होऊ न देण्याचा विवेक हे अनुभवी शिक्षकांचे मोठे हत्यार असते.

वाईट अनुभव टाळण्याची एक युक्ती म्हणजे विद्यार्थ्यांचा अपमान करणे टाळणे. शिक्षा करणे वेगळे आणि अपमान करणे वेगळे. मुख्याध्यापकांनी शिक्षकाचा अपमान केल्यावर शिक्षकाला जसे वाटते तसेच शिक्षकाने विद्यार्थ्याचा अपमान केला तर विद्यार्थ्याला वाटते. शिक्षकाने आपल्या सकारात्मक अपेक्षा विद्यार्थ्यापर्यंत त्याचा अपमान न होऊ देता पोहोचवणे हे त्याचे खरे कौशल्य असते.

हे कौशल्य विकसित करण्यासाठी एक उपयुक्त तंत्र असे आहे : विद्यार्थ्याला कोणताही प्रश्न विचारल्यानंतर (शिस्तीच्या/ अभ्यासाच्या, कोणत्याही बाबतीत) विद्यार्थ्याला त्याने प्रतिसाद सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेला कालावधी (लेटन्सी पिरियड) वाढवणे 2 (संयम, संयम!).

Online अध्यापनाच्या वेळी तर संपर्कसाधनांच्या मर्यादा लक्षात घेऊन लेटन्सी पिरियड किती असावा ह्यावर विशेष विचार करावा. अनुभवातून हे उमजेलच पण शक्यतो ह्या मुद्याकडे दुलर्क्ष होणार नाही हे पहा.

संदर्भ :

1. https://www.scholastic.com/teachers/articles/teaching-content/25-sure-fire-strategies-handling-difficult-students/

2. http://aarf.asia/download.php?filename=../current/2019/Mar/diygSTb4ZAJm90z.pdf&new=IRJHSS2March19-9192.pdf

3. https://paramchandra.blogspot.com/2014/01/18.html

Sunday, June 14, 2020

What is e-learning?

E-learning is differently understood by different people. It has caused to change our idea of what a classroom is. Multimedia are increasingly becoming a part of teaching and learning. The term covers a gamut of similar concepts. Some call it "Distance Learning," "Distance Education," "Digital Learning;" others call it "Open Learning," "Virtual Education," and yet others may term it as "Multimedia Discourse" or "Online Education." All these are substitutes each with a slightly different meaning but all essentially referring to electronic or 'e'-learning.

In this process of implementing e-learning, we have come across a number of obstacles which we will have to overcome through sustained effort.

E-learning is not only promoted by supply side techno reforms but also by emerging global markets demanding techno-savvy, digitally literate and skilled manpower.

E-learning can be mainly classified into two types: Synchronous e-learning and Asynchronous e-learning. You can see the details here.1

In synchronous e-learning, activities of the teacher and the students are ''in sync.'' They work with each other from different locations but at the same time. They use Virtual Classroom platforms, Audio and Video Conferencing, Chat facilities, Webinars, Application Sharing, Instant Messaging or some such tool which allows them to interact in real time. Here the students have to learn keeping pace with the group/ instructor.

In asynchronous e-learning, the teacher and the students need not work at the same time, wherever they are. Instructions are pre-recorded and delivered while the students can access the resources at convenient time and generally at convenient pace; or are able to reaccess the resource. Emails, blogs, discussion forums, e-Books, CDs, DVDs, PPTs, movie clips, data storage units, self-paced online courses, discussion forums & groups and message boards are some of the resources for asynchronous e-learning. In fact we could include printed material as asynchronous learning.

Conventional books are an example of an asynchronous learning (though not e-learning) resource whereas e-books are an asynchronous e-learning resource. (Our regular classes are an example of synchronous learning though it is not e-learning).

Online digital lessons need to be designed with an *imaginative mix of synchronous and asynchronous resources.* The resources need to be delivered in a logical sequence. Students need to develop study habits to prepare themselves using asynchronous sources first and then refine their understanding through synchronous resources of live classrooms. Thereafter students should be encouraged to revise and consolidate learning through exercises provided for the purpose.

(1. https://blog.commlabindia.com/elearning-design/types-of-elearning)

Saturday, May 30, 2020

“Learning Outcome” अध्ययन परिपाक/ अध्ययन परिणाम/ फलित म्ह्णजे काय? --शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 28

What is the meaning of the term ''Learning Outcome?'' (अध्ययन परिपाक/ अध्ययन परिणाम/ फलित म्ह्णजे काय?)

Here is an example: If a teacher teaches her lesson and thereafter if the students are able to add one digit to another, then ''ability to add single digit numbers'' becomes the ''Learning Outcome''.

A teacher teaches something and its learning outcome means whatever that teaching enables the student to do.

( https://people.ok.ubc.ca/cstother/Learning%20Outcomes.pdf)

Learning Objectives are different from Learning Outcomes. Learning Objectives are the results that are desirable whereas Learning Outcomes are results that are achievable.

Therefore we could have the same Learning Objectives for say class IX but plan different Learning Outcomes for different divisions of class IX. (अध्ययनाची उद्दिष्टे आणि फलिते वेगवेगळी असू शकतात.)

For those who want to know more about Learning Outcomes and learning objectives: https://teaching.utoronto.ca/teaching-support/course-design/developing-learning-outcomes/what-are-learning-outcomes/

Wednesday, March 25, 2020

स्वामी विवेकानंद यांच्या दृष्टिकोनातून ‘शिक्षण’

 अनेक भारतीय विचारवंतांनी शिक्षणासंबंधी मौलिक चिंतन केलेले आहे. शिक्षणाकडे आधुनिक दृष्टीने पाहणारे एक तत्त्वचिंतक म्हणून स्वामी विवेकानंदांचे नाव घ्यावे लागेल.अद्वैत आश्रमाद्वारे1 2008 साली प्रकाशित करण्यात आलेले "My Idea of Education''2  हे स्वामीजींच्या शिक्षणविषयक विचारांचे संकलन हे एक संग्राह्य पुस्तक आहे. पुस्तकातील वेच्यांचे संकलन डॉ. किरण वालिया ह्यांनी केलेले असून ह्या पुस्तकाला असलेले स्वामी प्रभानंदांचे प्रास्ताविक आणि स्वामी यतीश्वरानंद3 ह्यांची प्रस्तावना हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य होय. Complete Works Of Swami Vivekanand ह्या 9 खंडात्मक संकलनातून घेतलेले हे वेचे आहेत. The first duty is to educate people.” अशा अनेक अन्वर्थक उद्धृतांनी हे पुस्तक नटलेले आहे. विषयानुरूप पुस्तकातील वेच्यांचे 18 उपभाग केलेले आहेत :  

1. Philosophy of Education
2. Socicty and Education
3. The True Teacher
4. The Teacher and The Taught
5. Education of the Masses
6. Educating The Women
7. Language
8. The Mother Tongue
9. The Sanskrit Language
10. Higher Education
11. Technical Education
12. Practical Experience
13. Concentration
14. The Mind
15. Power of Knowledge
16. Music and Art
17. Character-Building
18. Harmony of Religions
 

  जगातील विचारवंतांनी स्वामी विवेकानंदांविषयी काय म्हटले आहे ह्याचे संकलन पुस्तकाच्या परिशिष्टात केलेले आहे. नागपूरच्या रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेले 'आदर्श शिक्षण'4 हे विवेकानंदांचे पुस्तकही संग्राह्य आहे. 
    
 ह्या पुस्तकातील नमुना प्रकरण ह्या संकेतस्थळावर6 वाचता येईल.
'शिक्षकाचे कर्तव्य' ह्यासंबंधी स्वामीजी म्हणतात: ''ज्याप्रमाणे तुम्ही एखादे रोपटे वाढवू शकत नाही त्याप्रमाणे तुम्ही एखाद्या लहान मुलाला शिकवू शकत नाही. तुम्ही फक्त्त अकरणात्मक (negative) स्वरूपाचे काम करू शकता - तुम्ही फक्त्त मदत करू शकता. ज्ञान हे आतूनच प्रकट होत असते. लहान मूल आपल्या स्वभावानुसार स्वतःचा विकास करून घेत असते. तुम्ही फक्त्त विकासाच्या मार्गातील अडथळे दूर करू शकता.
 
समजा मी एक लहान मुलगा आहे. माझे वडील माझ्या हातात एक पुस्तक देतात. त्याच्यात 'ईश्वर असा असा आहे' असे लिहिलेले असते. आता प्रश्न असा आहे की, माझ्या मनात त्यांना हे भरविण्याची जरूर काय? माझे व्यक्तिगत विकसन कोणत्या मार्गाने होणार हे त्यांना कसे कळणार? माझा स्वाभाविक विकास कसा होणार आहे याबद्दल त्यांना काही कळत नसल्यामुळे ते आपल्या स्वतःच्या कल्पना माझ्या डोक्यात कोंबू इच्छितात व त्याचा परिणाम असा होतो की, माझी वाढच खुंटते. एखाद्या रोपट्याची, त्याला पोषक नसलेल्या जमिनीत तुम्ही वाढ करू शकत नाही.'' शिक्षणाचे समाजशास्त्र ह्या विषयाच्या अनुषंगाने स्वामीजींच्या विचारांचे विवेचन करणारा हा व्हिडिओ5 अवश्य पहावा.

Monday, May 6, 2019

शिक्षकाने प्रभावी ठरण्यासाठी काय करावे? --शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 27

शिक्षकाचा विद्यार्थ्यांशी संबंध मुख्यतः वर्गात येतो. त्यामुळे शिक्षकाने वर्गात प्रभावी कसे ठरावे हा उपप्रश्न महत्त्वाचा ठरतो. नव्या शिक्षकाने प्रभावी ठरण्यासाठी आपला अधिकार कसा ठसवावा आणि अनुभवी शिक्षकाने प्रभावी शिक्षक म्हणून प्रस्थापित झालेला लौकिक कसा कायम राखावा असे आणखी दोन प्रश्न त्यातून उद्भवतात. आपण धीरोदात्तपणे आणि आत्मविश्वासाने वर्गात प्रवेश करावा असे प्रत्येक शिक्षकालाच वाटते.

ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ह्याच अनुदिनीमधील 24 व्या आणि 23 व्या प्रश्नांकडे एकदा पाहून घ्यावे. त्यानंतर 26 व्या प्रश्नात सुचविलेल्या तंत्राने पुढे दिलेल्या एखाद्या पडताळा यादीसारखी यादी तयार करावी. अशा अनेक नमुना याद्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यांची मदत जरूर घ्यावी पण आपण स्वतः आपल्यासाठी यादी करणे आवश्यक आहे.

1. आपल्या स्वतःच्या वर्तणुकीकडे आपण सतत पाहतो का?

2. वर्गातील अनेक समस्या शिक्षकाच्या वर्तणुकीच्या थेट परिणामी उद्भवत असण्याची शक्यता अअसते.या दृष्टीने आपण घटनांकडे पाहतो का?

3. केवळ विद्यार्थ्यांच्याच वर्तणुकीचा विचार आपण करतो का?

4. शाळेच्या संघटनामध्ये किंवा प्रशासनामध्ये असलेल्या उणिवांमध्ये मुलांच्या अनिष्ट वर्तणुकीची कारणे दडलेली आहेत का?

5. विद्यार्थ्यांची वागणूक कशी असावी आणि त्यांच्याकडून अपेक्षित आदर्श दृष्टिकोन कसा आहे ह्याची चर्चा आपण त्यांच्याशी केली आहे का?

6. शाळेमध्ये आणि शाळेबाहेर विद्यार्थ्यांचे जीवन कसे आहे आणि दोन्हीकडे त्यांनी काय कामे करावीत ह्याविषयी आपण आस्था दर्शवितो का?

7. आपण आपल्या व्यवहारात सातत्यपूर्ण, न्याय्य आणि ठाम असतो का?

8. एक धोरण म्हणून स्तुतीचा सढळ वापर आपल्या अध्यापनात होतो का?

9. आपण पदोपदी अडत असल्यास योग्य लवचिकपणा दाखवतो का?

10. वर्गनियंत्रण आपण सकारात्मक विचाराने आणि सक्रियपणे करतो का?

वर्गव्यवस्थापन हा आपल्या नित्य चिंतनाचा विषय असावा! विषयावर सतत विचार करून आपण ही पडताळा यादी वाढवू शकतो. वर्गातील आपली शब्दरचना योग्य तेथे आदेशात्मक, संभाषणात्मक, प्रश्नात्मक किंवा प्रतिसादात्मक आहे का? नजरेचा यथायोग्य वापर, समर्पक हावभाव, शरीराची ठेवण, वर्गात उभे राहण्याची जागा, वर्गात फिरण्याची सवय/ क्षमता, विद्यार्थ्यांच्या जवळ जायचे की अंतर राखायचे अशा देहबोलीशी संबंधित उपाययोजना नोंदवून त्यांची स्वतःशी उजळणी करून ह्या उपायांबाबत आपण सजग राहू शकतो.

आपण जो विषय शिकवणार आहोत त्या विषयावरील प्रभुत्व आणि शिकवण्यातील आपला उत्साह ह्या दोन मुख्य गोष्टी यशस्वी वर्गव्यवस्थापनासाठी आवश्यक असतात. इतर दुय्यम गोष्टींची चर्चा आपण वर केली आहे. त्यांचे भान राहण्यासाठी प्रत्येकाने एक चेकलिस्ट म्हणजे पडताळा यादी वरीलप्रमाणे अवश्य तयार करावी.

Tuesday, April 30, 2019

वामनपंडित – यथार्थदीपिका ह्या ग्रंथाचे कर्ते

`नमिला साष्टांग श्रीपतिभक्तिरसज्ञ वामनस्वामी ।
रसभावना तत्कवना मानी या तेवि वाम न स्वामी’
- मोरोपंत
शाळेत वामनपंडितांच्या आणि रघुनाथपंडितांच्या1 कविता होत्या त्यामुळे ही नावे कानावरून गेलेली, ओळखीची होती.
पुढे वामनपंडितांनी (मूळ नाव – वामन नरहरी शेष) गीतार्थबोधिनी ह्या ग्रंथात गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे मराठी समश्लोकी, आर्या, हिंदी दोहा, मराठी ओवी आणि अभंग अशा पाच प्रकारच्या रचनांमध्ये केलेले रूपांतर वाचनात आले. केतकरांच्या ज्ञानकोशातील वामनपंडितांवरील नोंदीचा काही भाग असा आहे -

“यमकें लांब लांब साधण्यांत याचें कौशल्य दिसून येतें. म्हणून यास यमक्या वामन असेंहि म्हणतात. याचें कांहीं भाषांतररुप काव्य आहे व कांहीं स्वतंत्र आहे. भर्तृहरीचीं श्रृंगार, नीति वैराग्य शतकें, गंगालहरी, समश्लोकी गीता हीं भाषांतरित होय. निगमसागर नांवाचा वेदांतपर ग्रंथ त्यानें लिहिला आहे. त्यानंतर, 'यथार्थदीपिका' या नांवाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या सूचनेवरुन त्यानें लिहिली. व तींत आंधळी भक्ति ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग म्हणून प्रतिपादिलें आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे.’’
जिज्ञासूंनी मूळ नोंद2 येथे पहावी.
आधुनिक काळात अशा काव्याला कृत्रिम म्हणून हिणवण्यात आले असले तरी पाच प्रकारच्या काव्यरचनांच्या स्वभाव लक्षात घेऊन केलेली ही रूपांतरे पाहिली की आपण थक्क होतो. उदाहरणार्थ आपण पुढील श्लोक पाहू :
मूळ श्लोक
सञ्जय उवाच
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ २-१ ॥
वामनपंडितांची गीतार्थबोधिनी
समश्लोकी
कृपाविष्ट तसा पार्थ आशीं नेत्रांत दाटली
बोले विषादयुक्तातें त्यातें हें मधुसूदन ॥
आर्या
संजय म्हणे किरीटी साश्रुसखेदहि बहूकृपावंत । होतां मधुसूदन तो बोले वचनें तयासि भगवंत ॥
दोहा
लेऊ सास असुवाभरें अर्जुन करुणाभाय । बहुबिखादसों जुगत लखी बोले श्री जदुराय ॥
ओवी
संजय म्हणे धृतराष्ट्रातें । अर्जुन वेष्टिला मोहें बहुतें । अश्रुपात आलें नेत्रांतें । देखोनि बोलिला श्रीकृष्ण ॥
अभंग
श्री गुरुव्यासाचा । शिष्य सद्विद्येचा । धृतराष्ट्रदेवाचा । –तोषदानी ॥1॥ बोले राया देव । उघड अपूर्व । तरी हें वैभव । भोक्ता होसी ॥2॥ कृपेनें व्यापीला । सांडित अश्रूला । येथें पार्थ भ्याला । विषादानें ॥3॥ मग मधुरिपू । शांतवी अमूपू । शांतवावें वपू । तुका म्हणे ॥4॥

ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) ह्या टीकेप्रमाणे वामनपंडितांनी लिहिलेली गीतेवरील ओवीबद्ध टीका यथार्थदीपिका ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरीइतका हा ग्रंथ पुरातन आणि समृद्ध नसला तरी त्याची शैली मर्मग्राही असून विविध प्रमेयांचा विभिन्न दृष्टिकोनांमधून केलेला अभ्यास आणि ज्ञानयुक्त सगुणभक्तिचे प्रतिपादन हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
उदाहरणार्थ,

यांस मी मारूं कैसा? । इतकाच श्लोकाचा वळसा ।
हे मरती कीं शोक ऐसा । न करी अर्जुन ॥
ऐसा वाखाणितां अर्थ । हा दोष ठेविती समर्थ ।
याचा अर्थ यथार्थ । वाखाणिला ऐसा ॥
कीं यांस मारणें अधर्म । तेव्हां शोक करणें अधर्म ।
तरी श्लोकाचें मूळ भ्रम । कीं हे मरती म्हणोनि ॥   


वामनपंडितांचे आजोबा वामन अनंत शेष हे विजापूर दरबारी ग्रंथपाल होते. संस्कृत आणि फार्सी ह्या भाषा त्यांना अवगत होत्या अशी मराठी विश्वकोशातील नोंद आहे. 1666 साली वामनपंडित घरसंसार सोडून बाहेर पडले आणि त्यांनी संन्यास घेतला. 

निगमसार, कर्मतत्त्व, ब्रह्मस्तुती, अनुभूतिलेश हे त्यांचे वेदान्त तत्त्वज्ञानावर आधारित ग्रंथ आहेत. रामजन्म, अहिल्योद्धार, सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रा संवाद ह्या त्यांच्या रचना रामायणावर आधारित आहेत.  

गजेंद्रमोक्ष, नामसुधा, वनसुधा, वेणुसुधा, मृत्तिकाभक्षण, हरिविलास, रासक्रीडा अशी आख्यानेही त्यांनी रचलेली आहेत. द्वारकाविजय हा त्यांचा ग्रंथ भागवताच्या दशम्‌ स्कंधावर आधारित आहे.
वामनपंडितकृत सर्व संग्रहाचे प्रकाशक  माधव चंद्रोबा असून ग्रंथाची छपाई  शिळा छापखान्यात, दगडावर अक्षरे कोरून केलेली आहे. प्रकाशन काल - शके १७९० (सन १८६८) आहे. मुंबईतील बाळाजी आणि कंपनी ह्या प्रकाशनसंस्थेने वामनी ग्रंथ हे मासिक 1889 च्या नोव्हेंबरपासून सुरू केले. वामनपंडितांच्या ग्रंथांची जुनी हस्तलिखिते मिळवून, ती शुद्ध करून छापणे हे त्याचे उद्दिष्ट होते.
वामनपंडितांविषयी अधिक माहिती जया दडकर आणि इतरांनी संपादित केलेल्या `संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशामध्ये (आरंभापासून 1920 पर्यंतचा कालखंड) मिळू शकेल.
 
वामनपंडितांच्या3 67 हून अधिक ग्रंथांची यादी4 मराठी विकिपीडियाने दिलेली आहे. त्यांचे 20 ग्रंथ येथे5 ऑनलाईन उपलब्ध आहेत. यथार्थदीपिका हा ग्रंथ राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  आपल्या भाषेतील ह्या ठेव्याकडे अडगळ म्हणून न पाहता पूर्वग्रह बाजूला ठेवून ह्या समृद्ध साहित्याचा आस्वाद घ्यायला हवा.

संदर्भ :
1. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4
2. http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44
3. http://www.chanefutane.com/articles.php?articlesid=40
4. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4#.E0.A4.89.E0.A4.A4.E0.A5.8D.E0.A4.A4.E0.A4.B0_.28.E0.A4.B5.E0.A4.B0.E0.A5.8D.E0.A4.A4.E0.A4.AE.E0.A4.BE.E0.A4.A8.29.E0.A4.95.E0.A4.BE.E0.A4.B2.E0.A5.80.E0.A4.A8_.E0.A4.9F.E0.A5.80.E0.A4.95.E0.A4.BE
5. http://www.transliteral.org/pages/i141129060408/view

अस्तित्वाचा अर्थ

 

आपण अस्तित्वात असतो म्हणजे काय? हे 'असणे' काय आहे? असा गहन प्रश्न आपल्याला सहसा पडत नसला तरी कधीकधी मात्र तो पडतो. त्या प्रश्नाचे शब्द नेहमी असेच असतात असे नाही पण आशय मात्र असाच असतो.

आपल्या अस्तित्वाच्या ह्या अनुभवाविषयी सतत जागरुक असणे, आपण स्वतःमध्ये 'उपस्थित' असणे ह्याला हल्ली mindful meditation असे म्हणतात आणि तणावमुक्तिसाठी वापरण्याचे एक तंत्र म्हणून ते लोकप्रियही होत आहे. 'टू बी ऑर नॉट टू बी' असा प्रश्न आत्महत्येचे विचार करणार्या हॅम्लेटच्या मनात घोळत होता आणि त्यामागील हेतू 'टू एंड द हार्ट-एक' असा होता. अस्तित्वासह कधीकधी अशा असह्य हृदयवेदना अपरिहार्यपणे येतात.

जे. कृष्णमूर्ती ह्यांनी To be is to be related अशी सुंदर व्याख्या दिलेली आहे. वस्तू, व्यक्ती, वास्तू आणि स्थळकाळाशी असलेले आपले नातेसंबंध, त्यांचे अनुभव आणि त्यांच्या स्मृती ह्यांनीच आपलं अस्तित्व सिद्ध होत असतं. एखाद्या वस्तूचा मालक, एखाद्याचा बाप, एखाद्याचा मित्र, एखाद्या गर्दीचा घटक अशी आपली प्रतिक्षणी काहीना काही सापेक्ष ओळख असते. ही नाती जितकी विविध स्वरूपाची असतील तितके आपले अस्तित्व समृद्ध असते असे म्हणता येईल.

मानवी इतिहासातील सर्वाधिक बदल झालेला कालखंड म्हणजे 20 वे शतक असे म्हणता येईल. निसर्ग, सामाजिक व्यवहार, संस्कृती, जीवनशैली ह्या सर्वांमध्ये मुख्यतः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे क्रांतिकारक बदल झाले. सामाजिक-सांस्कृतिक उत्क्रांतीच्या ह्या पर्वातील त्या बदलांचा वेग अभूतपूर्व होता. कदाचित 21 वे शतक अधिक वेगवान असेल. परंतु अनुभवांच्या जातकुळीमध्ये 20व्या शतकात होती तितकी विविधता असेलच असे नाही. विसाव्या शतकातील पूर्वार्धात जन्मलेल्या आणि अजून हयात असलेल्या व्यक्तीने निसर्ग आणि तंत्रज्ञान ह्यांच्यातील विविधतेचा आणि जीवनशैलीतील बदलांचा जो अनुभव सहजगत्या घेतलेला आहे तसा पुढे क्वचितच घेता येईल.

                  Jagnyatil Kahiवस्तू, व्यक्ती आणि वास्तूंशी असलेल्या भावनिक गुंतवणुकीचे हृद्य चित्रण हा डॉ. अनिल अवचट ह्यांच्या लेखनाचा एक विशेष आहे. त्यांच्या अशा काही लेखांचे संकलन "जगण्यातील काही'' ह्या त्यांच्या पुस्तकात केलेले आहे. 2005 साली प्रकाशित झालेले हे पुस्तक अजूनही ताजे वाटते. त्यातील लेख तर त्यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. विविध स्तरांवर आणि विभिन्न संदर्भांमध्ये 'उपस्थित' राहून जगण्याचा अनुभव घेण्याची कला लेखकाला साधलेली आहे. हे लेखन स्वान्तसुखाय केलेले असो किंवा संपादकांची मागणी पुरविण्यासाठी केलेले असो, वैचारिकतेचा आव न आणणारे आहे. पण तरीही चिंतनाला प्रवृत्त करणारे आहे. मुख्य म्हणजे ह्या सर्वातून 20 व्या शतकातील उत्तरार्धातील मराठी मध्यमवर्गीय जीवनशैलीचा एक दस्तऐवज जाणता- अजाणता तयार झालेला आहे.

व्यवसायाने वैद्यकीय पेशातील डॉक्टर असलेल्या लेखकांचे लेखन बहुधा सरस असते असा माझा अनुभव आहे. त्यांचे लेखन त्यांच्या व्यवसायासंबंधी नसले तरीही सूक्ष्म निरीक्षण आणि अभ्यास करण्याची सवय ह्यामुळे समृद्ध झालेले असते.

भारताचा बौद्धिक इतिहास

एका इतिहासप्रेमी व्हॉट्सअप समूहावर 'ज्ञानेश्वरीत विज्ञान आहे का', किंवा ज्ञानेश्वर वैज्ञानिक होते का अशा स्वरूपाची चर्चा सुरू आहे. खरंतर ज्ञानेश्वरी हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे का, किंवा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून त्या ग्रंथाची ग्राह्यता किती असे प्रश्नाचे स्वरूप आहे. ज्ञानेश्वर एक की दोन की अनेक, ज्ञानेश्वरीत प्रक्षिप्त भाग किती? निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई ह्या ऐतिहासिक व्यक्ती होत्या की ही 'विठ्ठल'पंतांची मुले म्हणजे एक रूपक आहे वगैरे अनेक प्रश्न वस्तुनिष्ठ म्हणून विचारता येतील. अशा प्रश्नांचा उपहास न करता प्रभावी प्रतिवाद करायचा तर राजीव मल्होत्रा ह्यांच्या म्हणण्यानुसार `इंटलेक्च्युअल क्षत्रियां'ची गरज आजच्या घडीला आहे.

ज्ञानेश्वरांच्या काळी विबुध जनमानसात कोणत्या विज्ञानविषयक कल्पना रूढ होत्या ते पहावे असा विचार करून भारतातील बुद्धिगम्य ज्ञानाचा इतिहास एखाद्या पुस्तकात सापडतो का हे पहावे असे वाटले. केवळ ज्ञानेश्वरकालीन नाही तर Intellectual History of India असे काही लेखन शक्यतो भारतीयांनी केले असल्यास ते वाचण्याची उत्सुकता मला आहे. पीटर वॅटसन ह्यांचे 'द मॉडर्न माईंड, अॅन इंटलेक्च्युअल हिस्ट्री अव ट्वेंटिएथ सेंच्युरी' हे पुस्तक जसे आहे (फार बाळबोध किंवा थिल्लर नको आणि अति बोजडही नको) तसे लेखन भारताबाबत असल्यास ते वाचावे अशी माझी इच्छा आहे.

वरील खोडसाळ प्रश्न वादासाठी मी येथे उपस्थित केलेले असले तरी पूर्वी काही जणांनी ते उपस्थित करून झाले आहेत. ज्ञानेश्वरीतील विज्ञान हे एक निमित्त झाले. हल्ली व्हॉट्सअपवर आपण राजकीय आणि सामाजिक इतिहासांची चर्चा अनेकदा करतो परंतु वैचारिक किंवा प्राज्ञिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातूनही भूतकाळाकडे पाहणे उद्बोधक ठरेल असे वाटते. प्राज्ञिक इतिहासात सम्यक परामर्श घेतला जात असल्याने जर प्राज्ञिक इतिहासाचा वेध घेण्याची पद्धत अधिक रुजली तर खोडसाळ मुद्दे उपस्थित होणे आपोआप कमी होईल असे वाटते. मुद्यांना अनेक अंगांनी भिडणे, आंतरशाखीय विचारव्यूह रचणे प्राज्ञिक इतिहासाच्या कक्षेत येते. रिचर्ड व्हॉटमोअर आणि ब्रायन यंग ह्यांनी संपादित केलेल्या `अ कंपॅनियन टू इंटलेक्च्युअल हिस्ट्री' ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये प्राज्ञिक इतिहासाची चांगली ओळख करून दिलेली आहे.

1960 पासून प्राज्ञिक इतिहास ही केवळ आंग्लभाषक जगतामध्येच नाही तर संपूर्ण यूरपमध्ये ऐतिकासिक व्यवसायातील यशोगाथा ठरली आहे. प्राज्ञिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यामधून पाहिला न जाणारा विषय आजकाल सापडणे दुरापास्त आहे. नरभक्षण ( आणि इतरही भोगोपभोग), विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानवांची आणि प्राण्यांची शरीरे, भावना आणि संवेदना, आणि स्तोत्रे ह्या विषयांवरील प्राज्ञिक इतिहास आहेत. ह्या दृष्टिकोनाच्या यशाचे एक कारण म्हणजे विषयाचे आंतरशाखीय स्वरूप होय. प्राज्ञिक इतिहासकार केवळ विद्यापीठांच्या इतिहास विभागांमधूनच आहेत असे नसून राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, इंग्लिश, भाषा आणि भाषाशास्त्र, अभिजात वाङ्मय, देवत्व, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र, व्यवसाय आणि व्यवस्थापन, लोकप्रशासन, गणित आणि सर्व नैसर्गिक शास्त्रे ह्या विभागांमधूनही आहेत.

प्राज्ञिक इतिहास हा नुसताच राजांचा, राज्यांचा इतिहास नसून कल्पनांचा, विचारांचा आणि संबंधित विचारवंतांचा इतिहास असतो.

व्हॉट्सअप समूहांसारख्या व्यासपीठांवर इतिहासाशी निगडित विषयांवर अनेकांगी चर्चा झाल्यास हे परिप्रेक्ष्य सहजच साधले जाईल असे मला वाटते. तत्कालीन समाजमनांच्या धारणांचा वेध घेणे इतिहासप्रेमींसाठी नक्कीच रोचक आणि आनंददायी ठरेल.

`इंडिया - द एन्शण्ट पास्ट'

भारताच्या प्राज्ञिक इतिहासाविषयी काही वाचावं अशी इच्छा झाल्याने मी तसे काही वाचावयास मिळते का ह्या प्रयत्नात आहे. वैचारिक इतिहास, कल्पनांचा इतिहास, तत्त्वज्ञानाचा इतिहास किंवा साहित्याचा इतिहास ही सर्व प्राज्ञिक इतिहासाची उपांगे आहेत. बौद्धिक घटितांच्या अनुक्रमाने इतिहासाची मांडणी असे त्याचे स्वरूप असू शकते. मनू गोस्वामी, श्रुती कपिला, फैजल देवजी ह्यांचे लेखन त्यादृष्टीने वाचण्यासारखे आहे. पण ह्या लेखकांनी मुख्यतः अर्वाचीन कालखंड अभ्यासासाठी घेतलेला आहे. तोही महत्त्वाचा आहे परंतु प्राचीन काळाचाही समावेश अशा आढाव्यात असावा असे मला वाटत असल्याने मी तसे काही शोधत होतो.

सध्या मला बर्जोर अवारी ह्यांचे `इंडिया - द एन्शण्ट पास्ट' हे त्या जवळपास जाणारे पुस्तक मिळाले आहे. त्यांचा जन्म भारतातला पण बालपण आणि शिक्षण केनिया आणि झांझिबार येथे झालेले असून ते मॅंचेस्टर मेट्रॉपॉलिटन युनिव्हर्सिटीत मानद संशोधक म्हणून कार्यरत आहेत. नानाविध ग्रंथांमधून त्यांनी सामग्री गोळा केलेली असून त्यांची मांडणी संतुलित असल्याबद्दल अनेक तज्ज्ञांनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढलेले आहेत. प्रस्तावनेत ते म्हणतात,

''This imbalance in the thinking about India can be corrected by attending to other valuable legacies from ancient India. One such heritage, which needs deeper exploration, is its intellectual patrimony. The Indians composed learned texts long before the Europeans.''

Captureमहत्त्वाच्या ग्रंथसंपदेचे भान ठेवता ठेवता केलेली इसपू 7000 ते इस 1200 ह्या इतिहासाची मांडणी असे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगता येईल. इस 1200 नंतरचा इतिहास हा या पुस्तकाचा विषय नाही पण समारोपाच्या प्रकरणात त्याकडे एक दृष्टिक्षेप आहे. भारतीय समाजाच्या प्राज्ञिक सामर्थ्यावर भाष्य करणारे हे वाक्य त्या प्रकरणात आहे.

'Hindu culture and social values retained their energy and vitality even under the most anti-Hindu Islamic kings.'

भारतातील महत्त्वाच्या बौद्धिक कृतींची वर्गीकृत यादी करणे अशासारखा एक प्रकल्प आधुनिक इतिहासप्रेमींनी घ्यायला हरकत नाही. त्याचे एक प्रारूप म्हणावे अशी पुरवणी बर्जोर अवारी ह्यांच्या पुस्तकाच्या पुरवणीमध्ये आहे.

ही यादी परिपूर्ण आहे असे नाही. संस्कृतच्या 12वी च्या पुस्तकातही अशाच त-हेची यादी वाचल्याचे मला आठवते. पण एक प्रारूप किंवा template म्हणून आपण ह्याकडे पहावे असे मला वाटते. आपण आपल्या माहितीनुसार ह्या यादीत भर घालू शकतो, किंबहुना केवळ ग्रंथांची/ कृतींचीच नाही तर विषयांचीही भर घालू शकतो. केवळ प्राचीन भाषाच नाही तर अर्वाचीन भाषांमधील कृतींचीही भर आपण घालू शकतो. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ ह्या यादीत सहज स्थान पटकावू शकेल.

मेटामॉडर्न


हेमंत प्रकाश राजोपाध्ये हे जर्मनीतील ग्योटिंगेन विद्यापीठात पीएच. डी. संशोधक असून, ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाऊंडेशन, मुंबई येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत. दैनिक लोकसत्तामध्ये जानेवारी 2018 पासून दुस-या आणि चौथ्या रविवारी धारणांचे धागे हे सदर ते लिहीत आहेत. भारतीय प्राज्ञिक इतिहासाच्या शोधात असताना मी सहाजिकच त्यांच्या लेखनाकडे वळलो. इतिहासाची त्यांनी केलेली मांडणी पोस्ट मॉडर्नच्याही नंतरच्या म्हणजे मेटामॉडर्न दृष्टिकोनातून केलेली आहे. सोप्या भाषेत असलेले हे लेखन पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय पूर्णपणे समजत नाही असा अनुभव मला आला. पण समजल्यानंतर मात्र कसदार लेखन वाचल्याचा आनंद मिळतो. त्यांचे लेखन ह्या दुव्यावर सापडू शकेल.
लेखमालेचे स्वरूप पहिल्या लेखात सांगताना ते म्हणतात,
``या मोठय़ा पटाकडे पाहताना या पूर्ण वर्षांत आपण ऋग्वेदादी वैदिक संहिता, कर्मकांडप्रधान ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे, बौद्ध-जैन परंपरांतील प्रारंभिक प्रवाह, षड्दर्शने, स्मृती-सूत्रसाहित्य, धर्मशास्त्रांतर्गत स्मृती-सूत्र साहित्य, आर्षमहाकाव्ये, पुराणे, ऐतिहासिक भूगोल (Historical geography), धार्मिक भूगोल (sacred geography), मध्ययुगीन तत्त्वज्ञान-धर्मप्रवाह, मध्यपूर्वेतून झालेला इस्लामी शासकांचा प्रवेश, भक्ती संप्रदाय, वैदिक-पुनरुज्जीवनवादी चळवळी, उत्तर-मध्ययुगातील शिवकाळ-पेशवाई-टिपू वगैरे राजसत्ता आणि वर चर्चा केली त्याप्रमाणे वसाहतवादी व वसाहतोत्तरकालीन इतिहास असा विस्तृत पट पाहायचा आहे.''
ह्या विषयाची हाताळणी कशी केली आहे त्याचा उल्लेख त्यांनी पुन्हा आपल्या 1 जून 2018 च्या लेखामध्ये केला आहे.
``मानवी इतिहास-संस्कृती आणि सामाजिकतेविषयीच्या सिद्धांतनासंबंधीच्या अद्ययतन अशा बहुविद्याशाखीय, विविध चिकित्सात्मक परंपरा आणि पद्धतींच्या आधारे आपल्याला उपखंडाचा इतिहास जोखायचा आहे, हे आपण ठरवलं होतं.''
राजोपाध्यांची मांडणी अशा त-हेची बहुविद्याशाखीय, समावेशक असल्याने प्राज्ञिक इतिहासाच्या मांडणीच्या जवळ जाणारी आहे असे वाटले. त्यांचे सदर आपल्या सर्वांप्रमाणे मीही वाचीत होतो पण आता हे सर्व लेख पुन्हा वाचल्यानंतर त्या लेखनाचे महत्त्व आणि वेगळेपण प्रकर्षाने जाणवले.
(मेटामॉडर्न दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर कसा विचार सुरू आहे ह्याचा मासला हेन्झी फ़्रिनाख्त यांच्या ह्या दुव्यावरील लेखात मिळेल)

Tuesday, March 14, 2017

शिक्षकांसाठी Checklist, अर्थात पडताळा यादी म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 26



आपल्याला अनेक गोष्टी माहीत असतात पण त्या माहीत आहेत हे लक्षात नसते. मानवी मेंदूची स्मरणक्षमता सरावाने आणि वापराने वाढते हे जरी खरे असले तरी महत्त्वाच्या कामांसाठी आपल्या स्मरणशक्तिवर विसंबू नये अशी शिस्त आज व्यावसायिक जगाने लावून घेतलेली आहे. आजच्या जीवनशैलीत विविध प्रकारच्या माहितीकडे ग्राहकाचे लक्ष वेधून घेण्याची स्पर्धा सुरू असल्याने आणि सामान्य माणूस ह्या सर्व आकर्षणांपासून अलिप्त राहू शकत नसल्याने त्याने चेकलिस्ट्ससारख्या साधनाचा वापर करणे इष्ट आहे.
द न्यू यॊर्कर साप्ताहिकात डॉ. अतुल गवांदे ह्यांनी, शस्त्रक्रिया करताना पडताळा यादी वापरणे किती लाभदायक ठरते व त्यामुळे यशाची शक्यता कित्येक पटींनी कशी वाढते हे विशद करणारा एक लेख लिहिला. त्याचे सर्वत्र स्वागत झाले आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर ती चळवळच सुरू झाली. नंतरडॉ. गवांदे ह्यांनी ह्याच विषयावर पुस्तकही लिहिले. हे पुस्तक सर्वांनी, विशेषतः शिक्षकांनी वाचावे असे आहे. विमानांचे पायलट्स, गगनचुंबी इमारती बांधणारे वास्तुशिल्पी अशा अनेकांसाठी विविध प्रकारच्या पडताळा याद्या अनिवार्य असतात.


अध्यापनासाठी शिक्षकाला आज वेळाचा तुटवडा जाणवतो आहे. म्हणून पाठाकडे एक `प्रकल्प' म्हणून पाहणे आणि त्यासाठी प्रकल्प-व्यवस्थापनाची तंत्रे वापरणे आज आवश्यक झाले आहे. चेकलिस्ट्स किंवा पडताळा याद्या तयार करणे हे त्यातील एक प्राथमिक आणि सोपे तंत्र आहे.
पडताळा यादी वापरण्याचे हेतू अनेक असू शकतात. मात्र हेतू कोणताही असला तरी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हाच समान उद्देश पडताळा यादीमागे असतो. शिक्षक आपल्या कामांचा क्रम ठरविण्यासाठी, विद्यार्थ्याचे विषयज्ञान तपासण्यासाठी, क्षमतानिर्धारण करण्यासाठी, प्रगतीचा आलेख नोंदविण्यासाठी अशा अनेक हेतूंसाठी पडताळा यादी तंत्राचा वापर करू शकतो. अशा पडताळा याद्या तयार करणे, त्यांचा वापर करणे, त्यांच्यामध्ये सुधारणा करणे हा शाळांमधील नित्यक्रमाचा एक भाग असायला हवा. ह्या आधीच्या एका नोंदीमध्ये वर्ग पारिस्थितिकीय तपासणी यादीचा उल्लेख आलेला आहे.

पडताळा याद्यांची वेगवेगळी तयार प्रारूपे उपलब्ध आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार त्यांमध्ये बदल करून सुधारित प्रारूपे तयार करून वापरता येतील.





Saturday, December 17, 2016

deschooling कडे कल वाढण्यामागची मूळ कारणे कोणती? - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 25

 
डीस्कूलिंगची संकल्पना समजून घेण्यासाठी इव्हान इलिच (
Deschooling Society), पॉल गुडमन (Compulsory Miseducation) आणि एवरेट रेमर (School Is Dead) ह्यांचे साहित्य वाचल्यास मदत होईल.

जर एखाद्या प्राण्याला भूक लागलेली नसतानाही चाबूक मारून सतत खायला लावलं तर त्याची जशी अवस्था होईल तशी अवस्था आजच्या शालेय विद्यार्थ्यांची होते आहे असं अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणतो.

वाचायला कसं शिकवावं हा प्रश्नच नाही असं मज्जासंस्थेचे अभ्यासक म्हणतात. शहरातली मुले तर लिखित शब्दांच्या इतकी संपर्कात असतात की सामान्य मुलांना शब्द आणि त्यांचे लेखन ही सांकेतिक संकल्पना तात्काळ समजायला हवी. पण न समजण्याचं मुख्य कारण असं की ती शाळेत जातात! तिथे त्यांना बक्षिस आणि शिक्षा मिळते ती भलत्याच कारणांसाठी आणि एखाद्या गोष्टीत सहजी रस निर्माण होऊच नये अशी शालेय शिक्षणाची शैली असते. अनेक शाळा अशा असतात की त्या शाळांमध्ये विद्यार्थी जितका जास्त काळ जातील तितका त्यांचा बुद्ध्यांक घसरतो. मागे पडणारे अनेक विद्यार्थी जर रस्त्यावर भटकत राहिले असते तर त्यांचे शिक्षण जास्त चांगले झाले असते असेही संशोधनातून दिसून येते.
 
शाळांमध्ये पैसा ओतला की शाळा सुधारतात ही एक सार्वत्रिक अंधश्रद्धा आहे. पैशाने शिक्षण विकत घेऊ पाहणा-यांसाठी अनेक शाळांमधून अध्ययनाचा स्टंट किंवा तमाशा केला जातो आणि विद्यार्थ्यांचा नैसर्गिक बौद्धिक विकास तेथे खुंटतो. काही शिकणे ही कल्पनाच अशा विद्यार्थ्यांना भयंकर जाचक वाटू लागते. अखेरीस अशा विद्यार्थ्यांना रेमटावून त्यांच्यामधून एकमेकांशी स्पर्धा करणे हा एकमेव कार्यक्रम असलेले शिपुर्डे तयार केले जातात आणि अनेक सामाजिक समस्यांना हे शिपुर्डे नंतर कारणीभूत ठरतात.
 
लोकानुयायी धोरणे, श्रम आणि पैसा ह्यांचा अतोनात अपव्यय, आणि लहान मुलांच्या वैचारिक व भावविश्वाचा निर्दय खेळखंडोबा हे आजच्या औपचारिक शिक्षणाचे अनिवार्य घटक ठरत आहेत. शासकीय स्तरावरील सदोष कायद्यांमुळे आणि भ्रष्ट व्यवस्थेत यशस्वी होणा-या ठरावीक परवानाधारक व्यक्तींना शिक्षकाच्या व्यवसायाचा ठेका मिळालेला असून हे ठेकेदार देतील ते शिक्षण अशी शिक्षणाची सरकारी व्याख्या झालेली आहे. हे कमी म्हणून की काय लोक मेंढरासारखे धंदेवाईक कोचिंग क्लासेसच्या मागे धावत आहेत आणि आपल्या मुलांना क्लासेसमध्ये कोंबून मुलांचे बारीक पीठ पाडण्यात धन्यता मानत आहेत. खरेतर शाळा आणि क्लासेसची उपयुक्तता नोकरी करणा-या आईबापांच्या वाढत्या मुलांसाठी पाळणाघरे (= कोंडवाडे) इतकीच उरलेली आहे.

शालाबाह्य जीवनात विविध प्रकारच्या स्क्रीन्सकडे निर्बुद्धपणे पहात बसणारी मुले आता शाळांमधूनही कल्पनाशून्य स्मार्टबोर्ड लेसन्सचे रतीब जिरवताना दिसतात. रडक्या मुलांच्या तोंडात बोंडले खुपसावे तसे हे `स्मार्ट'बोर्डचे बोंडले मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आजच्या शिक्षकांचे आवडते आणि सोयीस्कर साधन झाले आहे.
 
अंतिमतः ह्या व्यवस्थेतून तयार होणारे अनेक 'उच्चशिक्षित' वैफल्यग्रस्त होत आहेत कारण आपल्याला काहीही येत नाही, आपण खरे काही शिकलेलो नाही हे त्यांना अंतर्यामी माहीत असते आणि ते सत्य त्यांना छळत राहते. घोकण्याची क्षमता असली तरी मेंदूला लागलेल्या चुकीच्या सवयींमुळे त्यांची शिकण्याची क्षमता ते हरवून बसलेले असतात.
 
शालेय शिक्षणाबाबत निराश झालेले विचारी पालक नाईलाजाने डीस्कूलिंग कडे वळत आहेत. पण ती वाट योग्य ध्येयाकडे जाणारी असली तरी चांगल्या शालेय शिक्षणाच्या तुलनेने अतिशय खडतर आहे. शाळेत न जाता विद्यार्थ्याने समाजाभिमुखता जोपासणे अतिशय अवघड आहे. आणि शिक्षण ही तर एक
सामाजिक प्रक्रिया आहे असे मानसशास्त्रीय प्रतिपादन आहे!

आदर्श शालेय समाजाची निर्मिती हे आजच्या काळाचे मोठे आव्हान आहे.

Sunday, December 11, 2016

वर्गाचे पारिस्थितिकीय विश्‍लेषण म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 24

 
वर्गात कार्यरत असलेल्या प्रेरणा, ताणेबाणे कसे असतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
  • तुमचे विद्यार्थी आणि तुम्ही एकमेकांसोबत बराच वेळ घालवता.
  • ह्या काळात शिकण्यासाठी पोषक असं वातावरण निर्माण कसं करावं ह्याची तुम्हाला काळजी असते.
  • विद्यार्थी अनेक आहेत, प्रत्येकाची शिकण्याची गरज वेगवेगळी आहे शिकण्याची शैली भिन्न आहे ह्याची तुम्हाला जाणीव असते.
  • शक्य तितके व्यक्तिगत लक्ष देता यावे असा तुमचा प्रयत्न असतो.
  • शिकण्याची प्रक्रिया सहजशक्य व्हावी आणि त्यायोगे विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण पदरात पाडून घ्यावं ह्यासाठी वर्गावर प्रभाव पाडणे ही तुमची व्यावसायिक भूमिका असते.
पण नेहमी हे शक्य होतं असं नाही. विद्यार्थीच जास्त प्रभाव पाडतात. तुम्हाला जोखण्यासाठी तुमच्या सहनशीलतेच्या सीमा पडताळून पाहतात. तुमचा "अंत" पाहतात. अखेरीस तडजोड करून, भाजीवाल्याशी घासाघीस करून भाजी खरेदी होते तसं शिकण्याचं माप विद्यार्थ्याच्या झोळीत टाकावं लागतं. ह्याची कारणं अनेक आहेत.

  • शिकण्याची ऊर्मी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सारखी नसते.
  • शाळेत येण्यामागे विद्यार्थ्यांचा उद्देश वेगळाच असतो. त्यांना आपापसात मिसळायचे असते आणि आपले "सोशल लाईफ" जगायचे असते.
  • शाळेत येण्यामागच्या त्यांच्या प्रेरणा आणि त्यांनी धड्यातलं काही शिकावं अशी तुमची धडपड ह्या दोन गोष्टींची स्पर्धा सुरू असते.

वॉल्टर डॉयल ह्यांनी वर्ग ही एक पारिस्थितिकी (इकॉलॉजी) असल्याची संकल्पना गृहीत धरून तिचा अभ्यास केला आहे. निसर्गात सजीवांच्या परस्पर व्यवहारांचा असा अभ्यास पारिस्थितिकी विज्ञान म्हणून शास्त्रज्ञ करीत असतात. जीवनांच्या प्रेरणांचा शोध घेऊन त्या प्रेरणांचा तोल निसर्गात कसा साधला जातो ह्याचा हा अभ्यास असतो. विद्यार्थी आणि शिक्षक हे घटक असलेली वर्गातील परिस्थिती असाच आपला तोल सांभाळत असते. हे संतुलन साधण्यासाठी अनेक औपचारिक आणि अनौपचारिक उपाययोजना केल्या जातात. विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या ऊर्मींचा खुबीने वापर करून शिकण्याला चालना देण्याकडे त्या वळविल्या जातात.

  • विद्यार्थ्यांचे गट पाडणे
  • काही सक्षम विद्यार्थ्यांना नेतृत्व देणे व शिक्षकाने आपले काही अधिकार त्यांना देणे
  • विद्यार्थ्यांना पायरी पायरीने यशाचा अनुभव देणे
  • शिक्षकाने आपल्या वर्तनाच्या मर्यादा आधीच आखून घेणे
  • शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वर्तनाच्या मर्यादा आधीच आखून देणे म्हणजे वर्गासाठी नियम काय आहेत हे सर्व विद्यार्थ्यांना नीट सांगणे. (विद्यार्थ्याच्या व्यत्ययकारक वर्तनाला तोंड देताना ह्या आणि ह्या अगोदरच्या मुद्याचे विशेष महत्त्व आहे.)
  • वर्गाला व्यक्तिमत्त्व देणे.
  • निसर्गाशी सांगड घालण्यास सुलभ अशा शिक्षणप्रणालींचा स्वीकार करणे (शांतिनिकेतन)
  • वर्गामध्ये शिक्षकांनी काय करावे आणि विद्यार्थ्यांनी काय करावे ह्याच्या तपासणी याद्या (चेक लिस्ट्स) तयार करणे व त्यावर अंमल करणे.

हे सारे कसे करावे ह्यासाठी बरेच साहित्य उपलब्ध आहे. पण मुळात हे करायचे आहे अशी इच्छा असणे आणि हे करणे शक्य आहे ह्याचे भान असणे महत्त्वाचे आहे.
वर्गाच्या पारिस्थितिकीय निर्धारणासाठी काही शाळा पुढील तीन पायर्‍यांचा वापर करतात 


1. शिक्षकासाठी प्रश्‍नावली - शिक्षकाने स्वतःशी नीट संवाद साधावा, वर्गव्यवस्थापनाची आपली शैली नेमकी काय आहे ह्याचे भान यावे, आपला अनुभव नेमका कसा आहे आणि तो हाती घेतलेल्या कामासाठी कितपत उपयोगी आहे ह्याची उत्तरे मिळून नेमक्या कोणत्या कृतीची गरज आहे हे स्वतःलाच स्पष्ट व्हावे असा ह्या मागचा उद्देश आहे. तुम्ही शिक्षक का झालात? शिक्षक व्हावेसे तुम्हाला कशामुळे वाटले? शिक्षक असण्यामधील सर्वात चांगली गोष्ट कोणती? शिकवताना तुम्हाला आनंद कशामुळे मिळतो? शिक्षक असण्यातील सर्वात कठीण किंवा नकोशी गोष्ट कोणती? अशा प्रश्‍नांचा समावेशही त्यात असतो.

2. वर्ग पारिस्थितिकीय तपासणी यादी - वर्गातील सध्याच्या प्रथांचे मूल्यमापन करण्यासाठी आणि आवश्यक गोष्टी केल्या जात आहेत का हे जाणून घेण्यासाठी यादी. वर्गाची संरचना, वर्तनाबाबत अपेक्षा, अध्यापन व्यवस्थापन, वर्गातील सकारात्मक व्यवहार, योग्य वर्तनाला प्रतिसाद, अयोग्य वर्तनाला प्रतिसाद. तपासणी यादीची ही मुख्य अंगे आहेत. ह्यात अनेक उपघटक संभवतात.

3. वर्ग निरीक्षण पत्रिका - प्रतिसाद देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते का? विद्यार्थी योग्य शैक्षणिक प्रतिसाद देतात का? वर्गात फार व्यत्यय आणतात का? तुम्ही विद्यार्थ्यांची स्तुती कितीदा करता? तुम्ही विद्यार्थ्यांची निंदा कितीदा करता?


तपासणी याद्यांचे नमुने/ याद्यांची प्रारूपे प्रत्येक शाळेने स्थानिक परिस्थितीनुसार तयार करणे आवश्यक आहे.









Sunday, September 11, 2016

मराठीने नुक्ता स्वीकारावा

आजच्या (11.09.2016) लोकसत्ता दैनिकामध्ये आलेला मराठीने नुक्ता स्वीकारावा हा प्रा. लछमन परसाराम हर्दवाणी ह्यांचा लेख वाचला. एक सुंदर लेख वाचायला मिळाला. ह्या लेखाला २१ ऒगस्ट रोजी ह्याच दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वसुंधरा काशीकर-भागवत ह्यांच्या लेखाची पार्श्वभूमी आहे.  अशा अभ्यासू व्यक्ती समाजात आहेत ही गोष्टही दिलासा देणारी आहे. अशा लेखनाला वर्तमानपत्रे अजूनही प्रसिद्धी देतात हेही सुखद आश्चर्यच. मायबोली आणि मनोगत ह्या संकेतस्थळांवरील या विषयावरील चर्चा वाचनीय आहेत.

विनोबांनी गीताईच्या आवृत्त्यांमध्ये नुक्त्याचा वापर केला आहे त्याची आठवण झाली. गीता प्रवचनांच्या अनेक देशी भाषांमधील आवृत्त्या त्यांनी देवनागरीत मुद्रित केल्याचीही आठवण झाली. देवनागरीमध्ये असल्याने बंगाली, गढवाली (मला येथे नुक्ता टाईप करता येत नाही, क्षमस्व!) आवृत्ती मी वाचू शकलो. पूर्वी गिरगिट ह्या ट्रान्स्लिटरेशन टूलमध्ये इतर भारतीय भाषांमधील वेबपेजिस् देवनागरीमध्ये वाचता येत असत. सध्या दुसरे एखादे असे टूल आहे का हे माहीत नाही.

डमरूतील ड आणि झाडातील ड वेगळे आहेत ही गोष्ट मला नवीन आहे. उच्चारस्थाने वेगळी आहेत का? डमरूतील ड अधिक दन्त्य आहे का? की भेद फक्त स्वरामध्ये/ स्वराघातामध्ये आहे? हिन्दीतील् ड प्रमाणे नुक्ता असलेला ड फ्रिकेटिव आहे का? ही माहिती विस्ताराने मिळण्यासाठी संदर्भ शोधायला हवेत. मराठी शब्दांचे उच्चार देणारा सोवनींचा पाच खंडांचा अभिनव मराठी शब्दकोश पाहण्यात आला होता. तोही पुन्हा पाहून घेतो.

कैलाशचंद्र भाटिया ह्यांचे हिंदी की मानक वर्तनी हे पुस्तक वाचल्याचे आठवते. वरील लेखाने कुतूहल चाळवल्याने ते पुन्हा वाचावे असे वाटू लागले आहे. हिंदी वर्तनीसाठीही एखादा आदर्श संदर्भ शोधायला हवा.

Monday, January 11, 2016

अध्यापकाची आणि अध्यापनाची गुणवत्ता - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 23

शिक्षकाची गुणवत्ता आणि शिकवण्याची गुणवत्ता ह्यात फरक काय?
  • शिक्षकाची गुणवत्ता आणि शिकवण्याची गुणवत्ता ह्यात फरक आहे आणि जर विद्यार्थ्यांचे अभ्यासातले यश आपल्याला सुधारायचे असेल तर ह्या दोन्ही गुणवत्तांची गरज आहे.
  • 'शिक्षकाची गुणवत्ता' म्हणजे शिक्षक वर्गामध्ये जे ज्ञान, कौशल्य आणि वातावरण आणतो त्याची गुणवत्ता.
  • 'शिकवण्याची गुणवत्ता' ही अधिक समावेशक संकल्पना आहे. त्यामध्ये संपूर्ण शाळा किंवा एखाद्या राज्याच्या शिक्षणप्रणालीचा अंतर्भाव होतो. संपूर्ण दिवसभर, वर्षानुवर्षे सर्व शिक्षकांतर्फे जे शिकवले जाते त्याची सर्वसाधारण गुणवत्ता असा त्याचा अर्थ आहे. शिकवण्याची गुणवत्ता उत्तम असेल तर तो शाळेच्या संघटनात्मक यशाचा परिणाम असतो.
  • उच्च गुणवत्तेचे शिक्षक अशा व्यवस्थेमध्ये उच्च गुणवत्तेचे शिक्षण देऊ शकतात. त्यांची गुणवत्ता फुकट जात नाही.
  • फक्त शिक्षकाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले तर आपण एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करीत असतो, व्यवस्थेवर नाही. मी चांगली शिक्षिका असूनही मला शिकवण्याचे काम चांगले करता येऊ नये असे दोष व्यवस्थेमध्ये असू शकतात.
  • थोडक्यात, शिक्षकाची गुणवत्ता म्हणजे व्यक्तीची गुणवत्ता जोपासली जाण्यासाठी दर्जेदार व्यवस्थेचे पाठबळ असणे फार महत्त्वाचे आहे.
अधिक वाचनासाठी हा लेख पहावा.

Saturday, September 12, 2015

वर्गव्यवस्थापनाचे महत्त्व. शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 22

 

अध्ययनप्रक्रियेत वर्गव्यवस्थापनाचे वेगळे असे सैद्धान्तिक महत्त्व आहे का?

शिक्षकाकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, विशेषतः माध्यमिक शाळेमध्ये मर्यादित वेळ असतो. शिक्षक पाठनियोजन करून तासिकेच्या मर्यादित वेळेत पाठ शिकवण्याचे उद्दिष्ट ठेवून वर्गात येतो. पाठनियोजनात यशस्वी वर्गव्यवस्थापन आणि वर्गाचे सहकार्य गृहीत धरलेले असते. प्रत्यक्षात वर्गाचे व्यवस्थापन नीट झाले नाही तर वेळ फुकट जातो आणि पाठनियोजन कोलमडते. म्हणून वर्गव्यवस्थापन महत्त्वाचे असते.

परंतु वर्गव्यवस्थापनाचा संबंध केवळ असा तांत्रिक आणि शिस्तीच्या अंगाने जाणाराच आहे असे नाही. वर्गामध्ये इतर विद्यार्थ्यांसमवेत शिकणे ही एक अध्ययन पद्धत आहे. सध्याच्या डी-स्कूलिंगच्या जमान्यात विद्यार्थी घरी एकट्याने /पालकांसमवेत शिकतात. एखाद्या शिक्षकाने चार-पाच विद्यार्थ्यांना झाडाखाली त्यांच्या आवडीचा विषय शिकवणे अशी शांतिनिकेतन शैलीची अध्ययन शैलीही असू शकते. सामाजिक संदर्भ आणि सामाजिक साहचर्य ह्या अध्ययनाला पोषक गोष्टी आहेत हा विचार वर्गांमध्ये अध्ययन/ अध्यापन होण्यामागे मूलतः गृहीत धरलेला आहे. सोयीचा विचार नंतरचा आहे.

शिकणारा विद्यार्थी सामाजिक संदर्भाशी जुळवून घेत असताना त्याचे आत्मकेंद्री भान विरते आणि शिकण्याची क्रिया घडते. आत्मकेंद्रित्व शिकण्याच्या आड येत असते. वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या सहवासामुळे सामाजिक संदर्भ आणि समन्वय अनिवार्य ठरून आत्मकेंद्रित्वाचा प्रभाव कमी होतो आणि अध्ययन अनायासे घडून येण्यास मदत होते असा हा विचार आहे. प्राचीन भारतीय परंपरेतही दोघांनी करायचा तो अभ्यास आणि एकट्याने करायचे ते तप असे म्हटले आहे. वर्गाची जोपासना एक सामाजिक आकृतिबंध म्हणून करणे शिक्षकासाठी हितावह असते.

“वर्गशिक्षक”, वर्गाची म्हणून असलेली एक अस्मिता (“आमचा वर्ग”,’ “आमच्या मॅडम” ) ह्या गोष्टी वर्ग हा एक अध्ययनगट म्हणून सिद्ध होण्यासाठी मदत करतात. अर्थातच “वर्ग” ह्या संकल्पनेकडे एक समूह म्हणून न पाहता एक अध्ययनशैली म्हणून पाहिले तर अध्ययनाला पोषक असे वर्गव्यवस्थापन सोपे होईल. शिस्तीच्या किंवा तांत्रिक अंगाने वर्गाचे व्यवस्थापन करतानाही वर्ग ही मूलतः एक अध्ययनप्रणाली आहे हे भान शिक्षकाला असणे इष्ट आहे.

शिक्षकाची जबाबदारी अशी आहे की “हा आपला वर्ग...” “आपण शिकतोय’’” असे वातावरण निर्माण करावे.

“माझा वर्ग...” आणि “तुम्ही शिकताय...” असे वातावरण नको.

“सहनाववतु..” हा मंत्र आहे.

Tuesday, May 26, 2015

दगडफोड्याची गोष्ट

लहानपणी “सोनसाखळी” नावाचं साने गुरुजींच्या गोष्टींचं एक पुस्तक माझ्याकडे होतं (स्मरणशक्ति दगा देत नसावी). त्या पुस्तकात एक दगडफोड्याची गोष्ट होती.

-----

एक दगडफोड्या होता. भर उन्हात घामानं निथळत दगड फोडत होता. वरून निर्दयपणे तळपणाऱ्या सूर्याकडे त्यानं पाहिलं. आणि सुस्कारा सोडून काम करीत राहिला. मनात म्हणू लागला, “हा सूर्य माझ्यापेक्षा किती मोठा आहे. मीही असा सूर्य असतो तर किती बरं झालं असतं”

त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला सूर्य व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” दगडफोड्यानं डोळे मिटून उघडले.

पाहतो तो काय, तो सूर्य झाला होता!

कौतुकानं तो खाली पाहू लागला. तळपता तळपता सर्वांना भाजून काढू लागला. झाडंझुडपं सुकू लागली, नद्या नाले आटू लागले. आपल्या प्रचंड सामर्थ्याचा धाक सूर्य सर्वांना दाखवू लागला.

आभाळात एक छोटा ढग आला. पाहता पाहता काळा झाला. मोठा झाला. त्यानं सूर्याला झाकून टाकलं. खाली काय चाललंय हेही सूर्याला दिसेना आणि कळेना. सूर्य मनात म्हणून लागला, “हा ढग माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा ढग असतो तर किती बरं झालं असतं”

त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला ढग व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” सूर्यानं डोळे मिटून उघडले.

पाहतो तो काय, तो एक काळा कुट्ट ढग झाला होता. सूर्याला झाकून टाकून लवकरच तो बरसू लागला. धो धो पावसामुळे खाली सर्व माणसांची आणि पशुपक्ष्यांची गाळण उडाली. नद्यांना पूर आला. ढग गर्वाने खाली पहात बरसतच राहिला. आपल्या सामर्थ्यावर खूष झाला. ढग सैरावरा पळणाऱ्या सृष्टीकडे पहात असताना एक दगड त्याला निर्विकारपणे बसलेला दिसला. त्याच्यावर ढग त्वेषाने बरसला. पण दगड तसाच ढिम्म होता. ढग निराश झाला. त्याच्या मनात आलं, “हा दगड माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा दगड असतो तर किती बरं झालं असतं”

त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला दगड व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” ढगानं डोळे मिटून उघडले. तो आता पावसात मजेत भिजणारा ढग झाला होता. निर्विकारपणे ढिम्म बसून होता.

काही दिवसांनी तेथे एक दगडफोड्या आला. ह्या दगडावर घणाचे घाव घालू लागला. दगडाचे तुकडे उडू लागले, त्याला भेगा पडू लागल्या. दगड कळवळला. मनात म्हणू लागला, “हा दगडफोड्या माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा दगडफोड्या असतो तर किती बरं झालं असतं”

त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “अरे दगड्या, तुला का दगडफोड्या व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” दगडाने डोळे मिटून उघडले. तो पुन्हा पहिल्यासारखा दगडफोड्या झाला होता.

----

ह्या गोष्टीची अनेक तात्पर्ये सांगता येतील. अनेकप्रकारे दृष्टांत म्हणून या गोष्टीचा वापरही करता येईल. काही गोष्टी मनात घर करून राहतात त्यातलीच ही गोष्ट आहे. भावनांना हात घालणारी नाही पण तरीही अंतर्मुख करणारी.

Sunday, April 13, 2014

रंग आणि त्यांच्या छटा सांगणारे मराठी शब्द

 

चित्रकलेत लुडबूड करताना किंवा चित्रांविषयी वाचताना विविध रंगांच्या छटांनी मोहित होणं स्वाभाविक आहे. बर्ण्ट सिएन्ना, कॅनरी यलो, ऍक्वा मरीन ब्लू अशा रंगछटा भेटीला येत तेव्हा मराठीतून अशा प्रमाणित रंगछटा का वर्णिल्या जाऊ नयेत असे मला वाटत असे. मराठीत असे नेमकेपणाने लिहिण्याबोलण्याची प्रवृत्ती (मुळातून मराठीमध्येच लिहिण्याबोलण्याची प्रवृत्ती) कमी होत असताना हा प्रश्न अधिकच सतावू लागला आहे. आपल्या भाषेच्या ह्या सुंदर अंगाकडे आपण दुर्लक्ष करून सुखद शब्दांचा खजिना गमावतो आहोत असे वाटते. मित्रांकडे आणि ओळखीच्या चित्रकारांकडे मी नेहमी हा प्रश्न काढतो.

जाहिरातीची एक क्लृप्ती म्हणून अलिकडे गाड्यांना दिल्या जाणाऱ्या रंगांसाठी नवे अनवट शब्द "कॉइन' झालेले कानावर पडतात. स्त्रियांच्या साड्यांच्या वेडामुळे रंगछटांचे काही शब्द मात्र आवर्जून मराठीत वापरले जाताना दिसतात. सामान्यतः फुलांच्या, पदार्थांच्या, पशुपक्ष्यांच्या नावांचा वापर नेमक्या रंगछटांचे वर्णन करण्यासाठी केलेला आहे. 

श्री. मारुती चितमपल्ली ह्यांनी त्यांच्या आईच्या वापरातील शब्दसंपत्तीसंबंधी आपल्या "चकवा-चांदणं' ह्या आत्मचरित्रात लिहिले आहे ते माझ्या आईने नुकतेच माझ्या निदर्शनाला आणले; ""डाळिंबी, मनुका, कथ्या, जास्वंदी, लाल, शेंदरी, गुलाली, मेंदी, गव्हाळी, जांभा, पोवळा, शरबती या तांबड्या रंगाच्या छटा; जिलेबी, लिंबू,सायी, चांदणी, सोनेरी, केशरी, केतकी ह्या पिवळ्या रंगाच्या छटा. लिंबोळी, पोपटी, शेवाळी ह्या हिरव्या रंगाच्या छटा. अस्मानी आणि आनंदी ह्या निळ्या रंगाच्या छटा. निळ्या रंगाला "आनंदी' हा किती अपरूप शब्द. अंजिरी, बैंगणी आणि मावा ह्या जांभळ्या रंगाच्या छटा. काळा करवंदी, बुक्का रंग, शिसवी, चंद्रकळा ह्या काळ्या रंगाच्या छटा. दुधिया, मोतिया आणि चांदी ह्या पांढऱ्या रंगाच्या छटा. गवळा, हरणा, कोसा, कवडी, मठ्ठ, मिसरी, मोरपंखी, राखी, अबोली ही रंगांची मिश्रणं...''

त्यानंतर आमच्या घरात काही काळ सगळ्यांना असे शब्द शोधण्याचं वेडच लागलं. माझे मुलगे माझी पत्नी आणि सून सगळेजण कामाला लागले. आम्हाला फारशी मजल गाठता आली नसली तरी जे काही शब्द जमा झाले त्यांची यादी ही अशी आहे :

राखाडी, विटकरी, तपकिरी, हळदी, मोरपिशी, लिंबू, पारवा, आकाशी, अंजिरी, कुसुंबी, वांगी, लाल, किरमिजी, तांबडा, शेंदरी, नारिंगी, अबोली, केशरी, कोनफळी, दुधी, मोतिया, सोनेरी, रुपेरी, चंदेरी, जास्वंदी, डाळिंबी, पोपटी, राणी, करडा, भुरा, कबरा, पिवळा, निळा, बदामी, गुलबाक्षी, जांभळा, हिरवा, शेवाळी, गुलाबी, मेंदी, चटणी, खाकी, भगवा, पिस्ता, अबिरी, गव्हाळी, पांढरा, पिरोजी...

आणखी एक महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे ह्या रंगांच्या प्रत्यक्ष छटा आणि शब्द ह्यांच्या जोड्या जुळवण्याचे. तो खरा दस्तऐवज होईल. ह्या आणि  ह्या संकेतस्थळावर इंग्लिशसाठी असे काम केलेले दिसेल. मराठीसाठी असा प्रयत्न ह्या संकेतस्थळावर केलेला आढळतो पण त्यासाठी जाणकार मराठी भाषकांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे . अर्थात संगणकीय प्रणालींच्या मर्यादा विचारात घेता ह्या छटा किती नेमकेपणाने दिसतात हा प्रश्न आहेच. रंगछटांचे वर्णन करणारे शब्द कसे तयार होतात आणि त्यांचे अर्थ कसे होतात ह्याचे विवेचन जिज्ञासूंना ह्या संकेतस्थळावर पाहता येईल.

Popular Posts